हैदराबाद : भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांनी नवोदितांना अधिक संधी देण्याकडे कल दर्शवला आहे. परिणामी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांची कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द जवळपास संपल्यातच जमा असल्याचे संकेत रोहित शर्माने दिले.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून विराट कोहलीने माघार घेतली. त्यामुळे पुजारा किंवा रहाणे यांचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात होती; परंतु अजित आगरकर अध्यक्ष असलेल्या निवड समितीने पुन्हा मागे वळून न पाहाण्याचा विचार निश्चित केला आणि विराटच्या ठिकाणी रजत पाटीदार या नवोदिताची निवड केली.
पाटीदारच्या निवडीबाबत विचारले असता रोहित म्हणाला, पुन्हा मागे वळून पाहाण्याचा आम्ही विचारही केला नव्हता. असा विचार करत राहिलो तर नवोदितांना संधी कधी मिळणार? सीनियर खेळाडूंना संघातून वगळणे हा निर्णय तेवढा सोपा नसतो, हे तेवढेच सत्य आहे.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चांगल्या धावा करून आपल्याला कसोटी संघात स्थान मिळवायचे आहे आणि १०० कसोटी खेळायच्या आहेत, असा मनसुबा अजिंक्य रहाणेने नुकताच व्यक्त केला होता; परंतु दोन रणजी सामन्यांत तो पहिल्याच चेंडूंवर शून्यावर बाद झाला होता. पुजारा मात्र रणजी सामन्यात चांगल्या धावा करत आहे.
सीनियर आणि अनुभवी खेळाडूंना संघातून वळगणे कठीण असते, कारण त्यांनी केलेल्या धावा त्यांचा अनुभव आणि त्यांनी मिळवून दिलेले विजय दुर्लक्षित करता येत नाही, असे सांगत रोहितने मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र लगेचच भविष्याबाबतही मतप्रदर्शन केले.
कधी तरी नवीन संघरचना करताना नव्या दमाच्या खेळाडूंचा विचार करावा लागतो, परदेशी संघाविरुद्ध खेळण्यासाठी संधी मिळताच त्यांच्यासाठी दरवाजे उघडावे लागतात. विराट खेळत नसल्यामुळे आता नवोदित खेळाडूचा पर्याय तपासण्याची ही संधी आहे, असे रोहित म्हणाला.