फॉर्मात असलेला युवा फलंदाज यशस्वी जयस्वालच्या पदार्पणाचे निमित्त धरून भारतीय कसोटी क्रिकेटचा बॅटन नव्या पिढीकडे देण्याची प्रक्रिया वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून आजपासून सुरू होत आहे.
वेस्ट इंडिजचा संघ अस्तित्व टिकवण्यासाठी लढत आहे, तर दुसरीकडे भारतीय संघ नवी टीम बांधण्याच्या प्रकियेत आहे. अशा दोन संघात ही लढाई आहे. जागतिक कसोटी अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाबाबत काही प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते.
रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या सिनियर्सचे भवितव्य, शंभर कसोटी सामने खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला वगळणे आणि यशस्वी जयस्वाल, ऋुतुराज गायकवाड यांचा करण्यात आलेला समावेश हे बदल भारतीय कसोटी संघात बदलाचे वारे वाहणारे आहे. यात आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत पुजाराऐवजी यशस्वी जयस्वाल हा बदल निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुजाराऐवजी जयस्वाल हा बदल झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार, हे महत्त्वाचे आहे. जयस्वाल हा मूळचा सलामीवीर आहे. मुंबई, पश्चिम विभाग आणि शेष भारत संघातून तो सलामीला खेळलेला आहे. रोहित शर्मासह सलामीला खेळलेला शुभमन गिल भारतीय संघात स्थान मिळवण्याअगोदर मधल्या फळीत खेळायचा. त्यामुळे उद्या रोहितसह जयस्वाल सलामीला खेळण्याची शक्यता अधिक आहे.
भारतातील विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी जयस्वालला सलामीचा खेळण्याचा आत्मविश्वास बळकट होणे आवश्यक आहे. उद्या त्याच्यासमोर केमार रोच, गॅब्रियल, अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डर यांचा सामना करावा लागेल.
जागतिक कसोटी मालिकेतील गेल्या दोन स्पर्धांत भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती, या वेळचे सर्कल भारतीय संघाला सोपे नसेल. त्यामुळे तुलनेने कमकुवत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध आत्ताच नव्या जोमाने तयार करावा लागणार आहे. हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमार कधी तंदुरुस्त होणार, हे अनिश्चित आहे आणि त्यानंतर तो किती कसोटी सामने खेळेल, यावर प्रश्नचिन्ह आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेसाठी मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या चेंडूची जबाबदारी मोहम्मद सिराजवर असेल. त्याचा साथीदार म्हणून शार्दुल ठाकूरला पसंती मिळू शकेल; पण मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि जयदीप उनाडकट यांनाही पुढच्या आव्हानांसाठी आत्तापासूनच तयार करावे लागणार आहे.
विंडसोर पार्क या मैदानावर गेल्या सहा वर्षांत एकही कसोटी सामना झालेला नाही. त्यामुळे खेळपट्टी कशी असेल, याचा अंदाज बांधण्यात येत आहे. काहीही असले तरी फिरकी गोलंदाजांना संधी असेल. त्यासाठी आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा भारतासाठी फायदेशीर ठरू शकतील.
तब्बल १८ महिन्यांनंतर अजिंक्य रहाणेने कसोटी संघात पुनरागमन केले आणि जागतिक कसोटी अंतिम सामन्यात त्याने भले आत्मविश्वाने फलंदाजी केली असली, तरी त्याच्याही भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. आता ऋतुराज गायकवाडचा पर्याय उभा आहे, तसेच श्रेयस अय्यर आणि केएल राहुल तंदुरुस्त झाल्यास तेही तयार असतील, अशा परिस्थितीत रहाणेसाठी प्रत्येक संधी त्याचे भवितव्य स्पष्ट करणारी असेल.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केए भारत, इशान किशन, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज ः क्रेग ब्राथवेट (कर्णधार), जेर्मीन ब्लॅकवूड, जोशुआ दा सिल्वा (डब्ल्यूके), अलिक अथानाझे, रहकीम कॉर्नवॉल, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, रेमन रेफर, केमार रोच, तेगनारायण चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, जोमेल वॅरिकन.
भारत-विंडीज मालिका : पहिली कसोटी ः वेळ सायंकाळी ७.३० पासून
थेट प्रक्षेपण ः डीडी स्पोर्टस, फॅनकोड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.