India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये 28 ऑगस्ट रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. यादरम्यान दोन्ही देशांचे दिग्गज क्रिकेटपटूही या सामन्याबाबत आपली मते मांडत आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे 2022 च्या आशिया कपमधून बाहेर पडला आहे. आफ्रिदीच्या आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर, पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक वकार युनूसने भारतीय संघाला टोमणा मारला होता, ज्याला भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला. यानंतर वकार युनूसने ट्विट करत लिहिले की, शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे भारतीय टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. आशिया चषक 2022 मध्ये आपण त्याला खेळताना दिसणार नाही हे दुःखद आहे. लवकर फिट व्हा चॅम्पियन. भारताकडून रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल टॉप ऑर्डरमध्ये खेळतात. यावर आता इरफान पठाणने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
टीम इंडियाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने ट्विट केले की, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यावेळी आशिया कप खेळत नाहीत ही इतर संघांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्याचे हे ट्विट पाकिस्तानच्या वकार युनूसला प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे. बुमराह आणि पटेल दुखापतींमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेच्या संघाला पाचवेळा तर पाकिस्तान संघाला केवळ दोनदा अशी कामगिरी करता आली आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिली जात आहे. 2018 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.