Ind vs Pak T20 Live Asia Cup : पाकिस्तानचा शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय; झाली 1 - 1 बरोबरी

आशिया कप 2022 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
India vs Pakistan
India vs Pakistan esakal

India vs Pakistan T20 Asia Cup 2022 :

पाकिस्तानने भारताचे 182 धावांचे आव्हान 19.5 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्या पार करत सुपर 4 मधील पहिला सामना जिंकला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 51 चेंडूत झुंजार 71 धावा केल्या. तर त्याला मोहम्मद नवाजने 20 चेंडूत 42 धावा करून सामना जिंकून दिला.

भारताने ठेवलेल्या 182 धावांचे आव्हान पार करताना पाकिस्तानने पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात केली. रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहलने देखील पहिल्या हाफमध्ये दोन विकेट घेत पाकिस्तानला बॅकफूटवर नेले होते. बिश्नोईने बाबर आझमला 14 तर युझवेंद्र चहलने फखर झमानला 15 धावांवर बाद केले.

मात्र त्यानंतर सलामीवीर मोहम्मद रिझवानने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने मोहम्मद नवाजच्या साथीने 10 षटकानंतर आक्रमक फलंदाजी करत धावांची गती वाढवण्यास सुरूवात केली. रिझवानने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले तर नवाज 15 व्या षटकात 42 धावांपर्यंत पोहचला होता.

शेवटची 5 षटके राहिली असताना भारताने पुन्हा पाकिस्तानला पाठोपाठ दोन धक्के देत सामन्यात वापसी केली. पाकिस्तान 15 षटकात 135 धावांपर्यंत पोहचली होती. पाकिस्तानला विजयासाठी 30 षटकात 47 धावांची गरज होती. क्रीजवर अर्धशतक करणारा मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाज होते. मात्र भुवनेश्वरने 16 व्या षटकात फक्त 4 धावा देत आक्रमक मोहम्मद नवाजला 42 धावांवर बाद केले. भुवनेश्वरने 63 धावांची भागीदारी तोडली. यामुळे पाकिस्तानचा मुमेंटम ब्रेक झाला.

त्यानंतर 17 व्या षटकात हार्दिक पांड्याने 9 धावा दिल्या खऱ्या पण त्याने पाकिस्तानची सर्वात महत्वाची विकेट घेतली. त्याने 51 चेंडूत 71 धावा करणाऱ्या मोहम्मद रिझवानला बाद केले. हा पाकिस्तानला मोठा धक्का होता. मात्र त्यानंतर भुवनेश्वरच्या 19 व्या षटकात 19 धावा दिल्या. त्यामुळे सामना 6 चेडूत 7 दावा असा आला.

मात्र अर्शदीपने तिसरा चेंडू निर्धान टाकला. पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने आसिफ अलीला बाद करत सामना 2 चेंडू 2 धावा असा आणला. मात्र पाकिस्तानने पाचव्या चेंडूवर दोन धावा करून सामना जिंकून दिला.

तत्पूर्वी, आशिया कप सुपर 4 च्या भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुलने धडाकेबाज सुरूवात करून देत आपले इरादे स्पष्ट केले. रोहित आणि राहुलने पहिल्या 5 षटकात 53 धावांपर्यंत मजल मारून देत पॉवर प्लेमध्ये 10 ची सरासरी राखली. मात्र त्यानंतर हारिस रौऊफने रोहितला 28 तर शादाब खानने केएल राहुलला 28 धावांवर बाद करत भारताला दोन धक्के दिले. गेल्या सामन्यातील स्टार सूर्यकुमार यादव देखील 13 धावांची भर घालून परतला. त्यामुळे 10 षटकानंतर भारताची धावगती थोडी मंदावली.

मात्र विराट कोहली तोपर्यंत सेट झाला होता. त्याच्या जोडीला आलेल्या ऋषभ पंतने देखील चांगली साथ देत भारताचा धावगती पुन्हा वाढवली. दरम्यान, ऋषभ पंतने शादाबला रिव्हर्स स्विंग मारण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फसला. तो 12 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या देखील शुन्य धावा करून माघारी परतला. त्याला मोहम्मद हुसनैनने बाद केले.

पंत - पांड्या बाद झाल्यानंतर विराट कोहलीने दीपक हुड्डाला साथीला घेत भारताचे दीडशतक धावफलकावर लावले. त्याने षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान शेवटची दोन षटके राहिली असताना दीपक हुड्डा 14 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. अखेर विराट कोहली 20 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 44 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. विराटनंतर आलेल्या रवी बिश्नोईने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार मारत भारताला 20 षटकात 181 धावांपर्यंत पोहचवले.

अर्शदीपचे नखे कुरतडायाल लावणारे शेटवचे षटक 

अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली. त्यानंतर आसिफ अलीने चौकार मारत सामना चार चेंडूत 2 धावा आणला. मात्र अर्शदीपने तिसरा चेंडू निर्धान टाकला. पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने आसिफ अलीला बाद करत सामना 2 चेंडू 2 धावा असा आणला. मात्र पाकिस्तानने पाचव्या चेंडूवर दोन धावा करून सामना जिंकून दिला.

भुवनेश्वरचे 19 वे षटक आणि 19 धावा 

भुवनेश्वर कुमारने दमदार 16 वे षटक टाकले होते. मात्र त्याने 19 व्या षटकात 19 धावा दिल्याने पाकिस्तान पुन्हा सामन्यात परतला.

हार्दिकने आणले सामन्यात 

हार्दिक पांड्याने मोहम्मद रिझवानला 71 धावांवर बाद कर भारताला पुन्हा एकदा सामन्यात आणले आहे.

भुवनेश्वर कुमारने दिला दिलासा

भुवनेश्वर कुमारने 20 चेंडूत 42 धावा करणाऱ्या मोहम्मद नवाझला बाद करत 63 धावांची भागीदारी तोडली.

मोहम्मद रिझवानचे अर्धशतक

मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा डाव सावर दमरा अर्धशतक ठोकले. त्याने 35 चेंडूत अर्धशतक ठोकत पाकिस्तानला शतक पार करून दिला.

63-2 : युझवेंद्रने दिला पाकला दुसरा धक्का

युझवेंद्र चहलने मोहम्मद रिझवान आणि फखर झमान यांची भागीदारी तोडली. त्याने झमानला 15 धावांवर बाद केले.

22-1 : पाकिस्तानला बिश्नोईने दिला पहिला धक्का

रवी बिश्नोईने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला 14 धावांवर बाद केले.

रवी बिश्नोईचे सलग दोन चौकार 

रवी बिश्नोईने 20 व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर चौकार मारत भारताला 181 धावांपर्यंत पोहचवले. आता पाकिस्तानसमोर 182 धावांचे आव्हान आहे.

विराट कोहली 60 धावांवर धावबाद 

विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 136.36 च्या स्ट्राईक रेटने 44 चेंडूत 60 धावा केल्या.

168-6 : दीपक हुड्डा षटकार मारण्याच्या नादात बाद

दीपक हुड्डाने 19 व्या षटकात नसीम शाहला षटकार मारण्याच्या नादात 16 धावा करून बाद झाला.

विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण 

विराट कोहलीने मोहम्मद नसीमला षटकार मारत आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

135-5 (15 Ov) विराटवरच मदार

भारताच्या डावाची अखेरची पाच षटके राहिली आहेत आणि आता सर्व मदार विराट कोहली आणि दीपक हुड्डा यांच्यावर असणार आहे.

 पाकिस्तानने भारताला दिला मोठा धक्का

हुसनैनने भारताला 15 व्या षटकात मोठा धक्का दिला. त्याने हार्दिक पांड्याला शुन्यावर बाद करत भारताचा पाचवा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला.

 126-4 : पंतला 'रिव्हर्स'ची मस्ती नडली

विराट कोहली आणि ऋषभ पंतने संथ झालेली भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र 14 व्या षटकात ऋषभ पंतने शादाबच्या आधीच्या चेंडूवर चौकार मारला होता. मात्र पुढच्याही चेंडूवर रिव्हर्स स्विप मारण्याची चूक केली आणि तो 12 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.

91-3 : सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी

सूर्यकुमार यादवने आजच्या सामन्यात निराशा केली. तो फक्त 13 धावांची भर घालून माघारी परतला. भारताने पहिल्या 10 षटकात 3 बाद 93 धावा केल्या आहेत. भारताने आतापर्यंत 9.3 च्या सरासरीने धावा केल्या.

रोहित पाठोपाठ राहुल देखील माघारी 

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शादाब खानने दुसरा सलामीवीर केएल राहुलला 28 धावांवर बाद केले.

भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा बाद 

पहिल्या 5 षटकातच भारताने 50 धावा पार केल्या होत्या. मात्र पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात रोहित शर्मा एक मोठा फटका मारण्याच्या नादात 16 चेंडूत 28 धावा करून बाद झाला.

 IND 34/0 (3) : भारताच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरूवात

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीच्या वेळीच आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याला केएल राहुलने देखील चांगली साथ दिली.

बाबर आझमने नाणेफेक जिंकली

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने संघात एक बदल केला आहे. शाहनवाज दहानीच्या जागी हसन अली संघात आला आहे. तर भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. दीपक हुड्डा संघात आला आहे तर रवी बिश्नोई देखील खेळणार आहे. तसेच हाँगकाँगविरूद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आलेला हार्दिक पांड्या देखील संघात परतला आहे.

भारत सात फलंदाज घेऊन मैदानात उतरणार आहे. याचबरोबर आजच्या सामन्यात तीन फिरकीपटू देखील दिसतील मात्र रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहल सोडून दीपक हुड्डाला किती गोलंदाजी मिळेल याबाबत शंका आहे. कारण हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाज देखील त्यांचा कोटा पूर्ण करतील.

भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना काहीच वेळात होणार सुरू

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 मधील पहिला सामना काही वेळातच सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना दुखापतींचा फटका बसला आहे. त्यामुळे आता ग्रुप स्टेजमधील प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

IND vs PAK Asia Cup T20 : भारत-पाक सामना कुठे 'फ्री' पहायचा तो जाणून घ्या...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कुठे, कधी आणि किती वाजता होणार आहे सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल? संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com