नवी दिल्ली - भारताने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्रमवारीत मोठी भरारी घेतली. "फिफा'च्या वतीने बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या क्रमवारीत भारताने 31 क्रमांकाची झेप घेत 101व्या स्थानावर उडी घेतली आहे.
"फिफा' क्रमवारीत भारत या अगोदर 132 व्या स्थानी होता. दोन दशकातील ही भारताची सर्वोत्तम क्रमवारी आहे. मे 1996 मध्येही भारत 101व्या स्थानी होता. काही दिवसांपूर्वी मिळवलेल्या दोन विजयांमुळे भारताची ही प्रगती झाली आहे. आशियामध्ये भारत 11 व्या स्थानी आहे.
भारताचे सर्वोत्तम मानांकन 94 राहिले आहे. फेब्रुवारी 1996 मध्ये ही मजल मारली होती त्यानंतर नोव्हेंबर 1993 मध्ये (99) आणि ऑक्टोबर 1993, डिसेंबर 1993 मघ्ये (100) असे मानांकन होते. गेल्या वर्षभरात भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी झालेली आहे. 13 पैकी 11 सामन्यांत विजय मिळवताना 31 गोलही केलेले आहेत. नुकत्याच झालेल्या आशियाई करंडक पात्रता सामन्यात म्यानमारचा 1-0 असा पराभव केला होता. म्यानमारवर 64 वर्षांत मिळवलेला हा पहिला विजय होता. त्यानंतर मित्रत्वाच्या सामन्यात कोलंबियावर 3-2अशी मात केली होती.
हा मार्ग सोपा नव्हता. तरुण रक्ताला संधी देऊन प्रत्येक स्थानासाठी स्पर्धा केल्यामुळे संघाची प्रगती होत गेली, योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याने मी समाधानी आहे, असे मत प्रशिक्षक स्टीफन कॉस्टंटाईन यांनी व्यक्त केले.
|