कोलकता - भारतीय फुटबॉल संघाची ताकद कर्णधार सुनील छेत्री असल्याचे मानले जात असले, तरी प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टटाइन यांनी फार वेळ भारतीय संघ छेत्रीवर अवलंबून राहणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.
भारतीय फुटबॉल महासंघाच्या वतीने प्रशिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेसाठी ते आले होते. या कार्यक्रमानंतर बोलताना ते म्हणाले, 'छेत्री नेहमीच आव्हानात्मक खेळाडू राहिला आहे. त्याच्या खेळात कमालीचे सातत्य आहे. त्याच्या खेळात व्यावसायिकतादेखील आहे; पण आता भारतातूनही अनेक नवे खेळाडू पुढे येत आहेत. सातत्याने खेळाडूंचा शोध सुरू आहे. याचा खूप फायदा झाला आहे.''
कॉन्स्टटाइन प्रशिक्षक झाल्यापासून आतापर्यंत 34 खेळाडूंनी भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. कॉन्स्टटाइन दुसऱ्यांदा भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले आहेत. पहिल्या टप्प्यात बायचुंग भुटिया उदयास आला, तर आता छेत्री भरारी घेत आहे. कॉन्स्टटाइन म्हणाले, 'या दोघांची मी कधीच तुलना करणार नाही. दोघेही वेगळ्या धाटणीचे खेळाडू आहेत. त्यांचे संघासाठीचे योगदान नेहमीच शंभर टक्के असते; पण आता परिस्थिती वेगळी आहे. भारतात सुरू असलेल्या गुणवत्ता शोधमोहिमेचा फायदा होत आहे. अनेक युवा खेळाडू पुढे येत आहेत आणि भारतीय फुटबॉलसाठी ही योग्य गोष्ट आहे.''
|