नवी दिल्ली : जसपाल राणा यांना द्रोणाचार्य पुरस्कार नाकारल्याबद्दल पुरस्कार समितीवर टीका केली जात आहे, पण त्यांच्या एकाही शिष्याने राणा यांचा उल्लेख मार्गदर्शक असा केला नसल्याचे आता समोर येत आहे. काहींनी त्यांना मेंटॉर म्हटल्याचे सांगितले जात आहे.
मनू भाकर, सौरभ चौधरी या नवोदित नेमबाजांच्या वरिष्ठ गटातील यशात जसपाल राणा यांचा मोलाचा वाटा आहे, पण या तसेच अन्य नेमबाजांनी टॉप (टार्गेट ऑलिंपिक पोडियम) योजनेसाठी सादर केलेल्या सत्य प्रमाणपत्रात राणा यांचा उल्लेख मार्गदर्शक म्हणून केलेला नाही. अमित शेरॉन हे आपले मार्गदर्शक असल्याचे सौरभ चौधरीने म्हटले आहे; तर मनू भाकरने सुरेश कुमार यांचे; तर अनीष भानवालाने हरप्रीत सिंग यांचे नाव दिले आहे.
जसपाल राणा यांनी आपण घडवलेल्या नेमबाजांची नावे दिली आहेत, पण त्याच नेमबाजांनी अधिकृतपणे जसपाल राणा यांना मार्गदर्शक म्हटलेले नाही. त्यांनी राणा यांना मेंटॉर म्हटले आहे. जर खेळाडूच आपल्या गुरूचे नाव घेत नसतील, तर त्यांना मार्गदर्शकांचा पुरस्कार कसा देणार, अशी विचारणा पुरस्कार समितीतील एका सदस्याने केली.
दरम्यान, राणा यांना पुरस्कार नाकारल्यावर अभिनव बिंद्रा यांनी समितीवर टीका केली होती. त्यांनी राणा यांचे शिष्य टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकून निवड समितीस खोटे ठरवतील असे म्हटले होते. समितीतील सदस्य बाईचुंग भुटिया यांनी केवळ तिघांनाच हा पुरस्कार देता येतो असे सांगितले होते.
ती अनुपस्थितीही भोवली
म्युनिच विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम फेरी सुरू असताना मनू भाकरचे पिस्तूल खराब झाले त्या वेळी तिला मदतीची गरज होती, पण त्या वेळी जसपाल राणा तिथे नव्हते. त्यामुळे मनूचे पदक हुकले तसेच ऑलिंपिक पात्रताही. क्रीडा प्राधिकरणाच्या आधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे निवड समितीचे लक्ष वेधले होते, असेही सांगितले जात आहे.
|