मुंबई : चार वर्षांनंतरच्या विश्वकरंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी उद्यापासून सुरू होणाऱ्या विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेद्वारे मिळेल. गतविजेत्या मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरवर आपली क्षमता दाखवण्याबरोबरच मुंबईचे जेतेपद राखण्याकडेही लक्ष द्यावे लागेल.
मुंबई आपली मोहीम सौराष्ट्रविरुद्धच्या लढतीने सुरू करणार आहे. एलिट साखळीतील अ गटात मुंबईला आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हैदराबाद, कर्नाटक, झारखंड, गोवा आणि केरळचेही आव्हान असेल. याचबरोबर ब गटातील लढतीकडेही मुंबईला लक्ष द्यावे लागेल. या गटात दिल्ली, ओडिसा, महाराष्ट्र, पंजाब, विदर्भ, हरियाणा, बडोदा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आहेत. अ तसेच ब गटात मिळून अव्वल पाच संघ उपांत्यपूर्व फेरीस पात्र ठरतील. त्यामुळे आव्हान नक्कीच सोपे नसेल. ही स्पर्धा 25 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.
मुंबईची मदार कर्णधार श्रेयस अय्यर तसेच अनुभवी सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. तसेच आशियाई 19 वर्षांखालील स्पर्धेत प्रभावी ठरलेल्या अथर्व अंकोलेकरच्या गोलंदाजीकडेही विशेष लक्ष असेल. अर्थात लांबलेला पाऊस तसेच मार्गदर्शकांची लांबलेली निवड याचा मुंबईच्या पूर्वतयारीवर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या स्पर्धेतील लढती - 24 सप्टेंबर ः वि. सौराष्ट्र. 25 सप्टेंबर ः वि. झारखंड. 29 सप्टेंबर ः वि. कर्नाटक. 1 ऑक्टोबर ः वि. केरळ. 3 ऑक्टोबर ः वि. आंध्र प्रदेश. 5 ऑक्टोबर ः वि. गोवा. 20 आणि 21 ऑक्टोबर ः उपांत्यपूर्व फेरी. 23 ऑक्टोबर ः उपांत्य फेरी. 25 ऑक्टोबर ः अंतिम फेरी.
|