Sourav Ganguly : पंत प्रभावशाली कर्णधार होईल; भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींनी केले कौतुक

यंदाच्या आयपीएलमधील दिल्ली संघाची मोहीम मंगळवारी संपली. १४ सामन्यांत ७ विजय आणि ७ पराभव झालेल्या दिल्लीने १४ गुणांची कमाई केली.
Sourav Ganguly
Sourav Ganguly Sakal

नवी दिल्ली : प्रत्येक सामन्यातील अनुभवानुसार पंतच्या नेतृत्व गुणवत्तेत प्रगती झाली आहे. उत्तरोत्तर यात आणखी सुधारणा होत राहील, अशा शब्दांत भारताचे महान कर्णधार सौरव गांगुली यांनी पंतच्या नेतृत्व शैलीचे कौतुक केले. पंतची नेतृत्व शैली साधी-सोपी असल्याचेही ते म्हणाले.

यंदाच्या आयपीएलमधील दिल्ली संघाची मोहीम मंगळवारी संपली. १४ सामन्यांत ७ विजय आणि ७ पराभव झालेल्या दिल्लीने १४ गुणांची कमाई केली. केवळ तांत्रिकदृष्ट्या त्यांचे आव्हान जिवंत आहे. हैदराबादचा संघ उर्वरित दोन सामन्यांत मिळून १९५ धावांच्या फरकाने पराभूत झाला तरच दिल्लीला प्ले-ऑफ गाठता येणार आहे; परंतु हे शक्य नसल्यामुळे दिल्लीसाठी यंदाची आयपीएल संपली आहे.

दीड वर्षानंतर रिषभ पंत या आयपीएललद्वारे क्रिकेटच्या मैदानात उतरला. मुळात तो सर्व सामने खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. खेळलाच तर तो इम्पॅक्ट खेळाडू म्हणून केवळ फलंदाजी करेल असेही बोलले जात होते; परंतु धैर्यवान अशा पंतने बंदी असल्यामुळे एका सामन्याचा अपवाद वगळता सर्व सामन्यांत सफाईदार यष्टीरक्षणही करून आपली तंदुरुस्ती सिद्ध केली.

पंत हा तरुण कर्णधार आहे. तो वेळेनुसार शिकत आहे. एवढ्या मोठ्या आणि जीवघेण्या अपघातानंतर तो केवळ परतलाच नव्हे तर आयपीएलचा पूर्ण मोसम खेळला, तो किती सामने खेळले याबाबत सुरुवातीला आम्हाला शंका होती, पुढच्या मोसमात काय होईल हे माहिती नाही, पण माझ्या सदिच्छा त्याच्या पाठीशी निश्चित आहेत, असे गांगुली यांनी सांगितले.

उत्तरोत्तर तो अधिक प्रगल्भ कर्णधार झालेला असेल, कोणीही कर्णधार पहिल्य दिवसापासून श्रेष्ठ कर्णधार नसतो; परंतु अनुभवातून तो शिकतो आणि प्रगती करतो. तो महान कर्णधार होतो. त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या अनुभवातून पंत अधिक चांगला कर्णधार झालेला असेल, असाही गौरव गांगुली यांनी केला.

गांगुली यांनी मुकेश कुमार आणि रशिख दार सलाम या वेगवान गोलंदाजांचेही कौतुक केले. रशिखमध्ये तर प्रत्येक सामन्यागणिक सुधारणा झाली आहे. दिल्लीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजी सोपी नाही. कारण खेळपट्टी फलंदाजीस उपयुक्त असून मैदान लहान आहे. त्यामुळे गोलंदाजीचा टप्पा आणि दिशा अचूक असणे आवश्यक असते. रशिखने यात प्रगती केली, असे गांगुली म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com