विशाखापट्टणम : पहिल्या कसोटी सामन्यात विशाखापट्टनमला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असताना एकदम कडक उन्हामधे तिसर्या दिवशीचा खेळ चालू झाला. कप्तान फाफ डू प्लेसिस आणि डीन एल्गरने सकारात्मक फलंदाजी करून भारतीय संघाला मोठ्या यशापासून लांब ठेवले. तिसर्या दिवशी उपहाराला खेळ थांबला तेव्हा एल्गर 76 आणि डू प्लेसी 48 धावांवर नाबाद परतले आणि पाहुण्यांची धावसंख्या 4 बाद 153 अशी झाली होती.
तिसर्या दिवशीचा खेळ चालू होताना एकदम कडक ऊन होते आणि उकाडाही प्रचंड होता. चिवट फलंदाजीकरता प्रसिद्ध असलेल्या टेंबा बवुमाला इशांत शर्माने पायचित केले तो चेंडू टप्पा पडून आत आला तसेच अपेक्षेपेक्षा थोडा खाली राहिला. ज्या षटकात इशांत शर्माला बवुमाची विकेट मिळाली त्यानंतर लगेचच विराट कोहलीने त्याला बदलून महंमद शमीला गोलंदाजीला का आणले हे समजले नाही.
डीन एल्गर विश्वासाने गोलंदाजांना तोंड देत होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कप्तान फाफ डू प्लेसिसने पहिल्या पासून सावध फलंदाजी करणे टाळले. त्याने फिरकी गोलंदाजांवर आडव्या बॅटचे स्वीपचे फटके मारत हल्ला चढवला. पुढे सरसावत अश्विनला डू प्लेसिसने मारलेला षटकार अफलातून होता.
एल्गरने अर्धशतक पूर्ण केले. आक्रमक क्षेत्ररचनेचा फायदा घेत दोनही फलंदाजांनी बेधडक फटके मारले. विसाखापट्टनची खेळपट्टी अजून फलंदाजीला पोषक असल्याने आणि हवामान थकवणारे असल्याने भारतीय गोलंदाजांना पहिला डाव संपवायला अजून बरीच मेहनत करावी लागणार आहे. उपहारानंतर फाफ डू प्लेसी - डीन एल्गरची जोडी लवकर तोडण्यात यश मिळाले तरच सामन्यात विजयाची गती सापडणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.