IND vs SL : चहल - अर्शदीप लढले मात्र लंकेने भारताचे केले पॅक अप

IND vs SL : चहल - अर्शदीप लढले मात्र  लंकेने भारताचे केले पॅक अप

दुबई : आशिया कप सुपर 4 मध्ये भारताचा सलग दुसरा पराभव झाला. श्रीलंकेने भारताचे 174 धावांचे आव्हान 6 फलंदाज आणि 1 चेंडू राखून पार केले. श्रीलंकेकडून कुसल मेंडीसने सर्वाधिक 57 धावा केल्या तर पथून निसंकाने 52 धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून युझवेंद्र चहलने 3 विकेट घेत लंकेवर दबाव आणला होता. मात्र भानुका राजपक्षे आणि दसून शानका यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 64 धावांची भागीदारी रचत भारताला विजयापासून दूर ठेवले. शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त 7 धावांची गरज असताना अर्शदीपने प्रभावी मारा करत सामना 2 चेंडू 2 धावा असा आणला मात्र अखेर शानका आणि भुनकाने विजय मिळवत लंकेला सुपर 4 च्या गुणतालिकेत टॉपवर पोहचवले.

भारताने ठेवलेल्या 174 धावांचे आव्हान पार करताना श्रीलंकेच्या सलामीवीर पथूम निसंका (52) आणि कुसल मेंडीस (57) यांनी दमदार सुरूवात केली. या दोघांनी संघाला 97 धावांची सलामी दिली. ही जोडी खेळत असताना भारत सामना हरणार असे वाटत होते. मात्र त्यानंतर युझवेंद्र चहलने लंकेला 12 व्या षटकात पाठोपाठ दोन धक्के देत लंकेची अवस्था 2 बाद 97 धावा अशी केली. चहलने निसंका आणि असलंका अशा दोघांची शिकार केली.

दरम्यान, आर. अश्विनने देखील गुणतिलकाला अवघ्या 1 धावेवर बाद करत लंकेला तिसरा धक्का दिला. आज चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या युझवेंद्र चहलने श्रीलंकेला कुसल मेंडीसच्या रूपात मोठा धक्का दिला. त्याने मेंडीसला 57 धावांवर बाद केले.

मात्र त्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानका आणि भानुका राजपक्षे यांनी आक्रमक अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी सामना 8 चेंडूत 9 धावा असा जवळ आणला. अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 7 धावांची गरजत होती. अर्शदीपने सामना 2 चेंडूत 2 धावा असा जवळ आणला. मात्र अखेरीस कर्णधार शानकाने 2 धावा पळून काढून सामना 1 चेंडू राखून जिंकला.

तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या दोन सामन्यात दमदार चेस करणाऱ्या श्रीलंकेने आजही चेस करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दुबईच्या स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करून सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंध्या उभारणे गरजेचे असते.

मात्र श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात महीश तिक्षाणाने केएल राहुलला पायचीत बाद केले. राहुल फक्त 6 धावांची भर घालून माघारी परतला. यानंतर आशिया कपमध्ये सलग दोन सामन्यात दोन अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहली क्रीजवर आला. मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज मधुशंकाने त्याचा शुन्यावरच त्रिफळा उडवला.

विराट आणि केएल राहुल स्वस्तात माघारी गेल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आक्रमक अर्धशतक ठोकत भारताचा डाव सावरला. त्याने सूर्यकुमार यादवबरोबर भागीदारी रचत भारताला 10 षटकात 79 धावांपर्यंत पोहचवले. यानंतर आक्रमक फलंदाजी करत रोहित शर्माने भारताला 12 व्या षटकात शतक पार करून दिले. मात्र रोहितची ही 41 चेंडूत केलेली 72 धावांची खेळी करूणारत्नेने संपवली. पाठोपाठ सूर्यकुमार यादव देखील 29 चेंडूत 34 धावा करून बाद झाला.

सूर्या बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी काही आक्रमक फटके मारले. मात्र ते दोघेही प्रत्येकी 17 धावा करून बाद झाले. दीपक हुड्डानेही निराशा केली. तो शेवटची 2 षटके राहिली असताना 3 धावांवर बाद झाला. अखेर अश्विनने शेवटच्या दोन चेंडूवर 8 धावा करत भारताला 20 षटकात 8 बाद 173 धावांपर्यंत पोहचवले. श्रीलंकेकडून मधुशंकाने 3 तर चमिका करूणारत्ने आणि शनकाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com