वेगळं काहीतरी करायचं म्हणून '555 ला अल्ट्रा'चं स्वप्न पाहिलं : आशिष कासोदेकर

वेगळं काहीतरी करायचं म्हणून '555 ला अल्ट्रा'चं स्वप्न पाहिलं : आशिष कासोदेकर

ला अल्ट्रा ५५५ कि. मी.मॅरेथॉन ही जगातील एक खूपच भयानक आणि क्रूर रेस म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यामध्ये स्पर्धक ५५५ किलोमीटरचे अंतर जे जगातील सर्वात उंच पाच खिंडीतून, साडे पाच दिवसात पूर्ण करतात. ह्या खिंडी समुद्रसपाटीपासून १७४०० फुटापेक्षा जास्त उंचीवर आहेत, जिथे ऑक्सिजनची पातळी 60 टक्केपेक्षा कमी आहे. म्हणूनच ही स्पर्धा म्हणजे मानवी सहनशक्तीचे एक प्रतीक आहे.

आतापर्यंत ही स्पर्धा १११, २२२ आणि ३३३ किमी या प्रकारात होती. ५५५ किमी चे हे पहिलेच वर्ष आहे. तसेच या वेळी स्पर्धे च्या सुरवातीलाच अनपेक्षीत पणे वातावरण खराब झाले होते. खारदुंग ला आणि वारी ला वरती बर्फ पडत होता. खिंडी च्या दोन्ही बाजुला अंदाजे २ किमी. पर्यंत १ ते २ फुट बर्फ होता आणि यामुळेच १७ ते २३ ऑगस्ट २०१९ ला आयोजित केलेली ही स्पर्धा एकदम ऐतिहासिक ठरली.

१७ ऑगस्ट ला संध्याकाळी सहा वाजता नुब्रा खोऱ्यातल्या सुमूर या गावातून ही स्पर्धा सुरु झाली. ५५५ च्या पाच स्पर्धकांबरोबर ३३३, २२२ आणि १११ किलोमीटर धावणाऱ्या एकूण ३५ धावपटूंनी धावायला सुरवात केली. १११ किलोमीटर चे अंतर फक्त ९ धावपटूंनी २० तासात पूर्ण केले, तर २२२ किलोमीटर चे अंतर ४८ तासात फक्त २ धावपटुंनी पूर्ण केले. १११ किलोमीटर चे अंतर पार करताना धावपटूंनी जगातली सर्वात उंच १८,३८० फुट अशी खरदुंग ला खिंड पार केली, तर २२२ किलोमीटर च्या धावपटूंनी सर्वात कठीण अशी वारी ला खिंड पार केली आणि ३३३ आणि ५५५ च्या धावपटुंनी टांगलांग ला खिंड पार केली. 

आणि त्या नंतर फक्त पाच धावपटूंनी सर्वात क्रूर असा ५५५ किलोमीटर चा परतीचा टप्पा पूर्ण करण्यास सुरवात केली. तीन दिवसात ३३३ किलोमीटर केल्यावर अजून २२२ किलोमीटर पूर्ण करणे आणि ते ही तांगलांग ला आणि वारी ला सारख्या भयानक १७५०० फूटा पेक्षा जास्त उंचीच्या खिंडीला दोनदा सर करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती.

पण आपल्या पुण्याचा आशिष कासोदेकर ह्याचा निर्धार एकदम पक्का होता. स्पर्धेची अंतिम रेषा लेह मध्ये शांती स्तुपा ला होती. त्याने ही स्पर्धा ६ तास अगोदर म्हणजेच केवळ १२६ तासांत खूपच रोमांचकारक पद्धतीने पूर्ण केली.

दोन विदेशी स्पर्धकां बरोबर ही स्पर्धा पूर्ण करणारा आशिष हा पहिलाच भारतीय ठरला आहे. ह्या अभूतपूर्व यशाने आशिष कासोदेकर हे पुण्याचे आणि भारताचे असे हे पहिलेच धावपटू आहेत ज्यांनी ५५५ ला अल्ट्रा मध्ये तिरंगा फडकवताना भारताची मान गर्वाने उंच केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com