मुंबई : रणजी अंतिम सामना आहे आणि कितीही आव्हान असले तरी पाठलाग करायचा. आम्ही पिछाडीवर होतो; परंतु विजयाचाच विचार केला होता. अखेरपर्यंत लढायचे हाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही ५३८ धावांचे आव्हान स्वीकारले होते, अशी जिद्द विदर्भचा कर्णधार अक्षय वाडकरने व्यक्त केली.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वाडकर म्हणाला. आव्हान अतिशय मोठे होते; परंतु आमच्या हातात दोन दिवस होते, त्यामुळे दीड दिवस तरी निर्धाराने फलंदाजी केली तर विजयी लक्ष्य गाठता येऊ शकेल, असा विचार आम्ही केला होता.
आजच्या दिवशी पहिल्या सत्रात मी आणि दुबे यांनी मुंबई संघाला विकेट दिली नाही तेव्हा मी मुंबई कर्णधार अजिंक्य रहाणेच्या देहबोलीवर लक्ष देऊन होतो. तो विचलीत झाला आहे का हे तपासत होतो. तसे झाले असते तर आम्हाला दडपण टाकण्याची संधी होती; परंतु रहाणेने तसे काहीच दर्शवले नाही, असे वाडकर म्हणाला.
मुंबई संघ बलाढ्य आहे त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर हरविणे सोपे नाही याची आम्हाला जाणीव होती, अशा परिस्थितीतही आम्ही त्यांना विजयसाठी झुंजवले याचा अभिमान आहे, अशा शब्दात वाडकरने आपल्या संघाचा गौरव केला.
खेळाडूंनी रणजी क्रिकेटचे महत्त्व जपले पाहिजे आणि त्यासाठी सर्वांना या स्पर्धेत खेळण्यास प्राधान्य देण्यास भाग पाडण्याच्या बीसीसीआयच्या प्रयत्नांचे अजिंक्य रहाणेने कौतुक केले.
मुंबईसाठी हे विजेतेपद मोलाचे आहे. कारण किमान १० खेळाडू तरी भारतीय संघातून वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. अशा परिस्थितीत इतर खेळाडूंसह तयार होत असलेला आमचा संघ तेवढाच बलवान आहे, असे अजिंक्य रहाणे म्हणाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.