अॅंटीग्वा : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने विंडीजच्या फलंदाजांना शरणागती पत्कारण्यास भाग पाडले. दिवसाअखेर विंडीजच्या आठ बाद 189 धावा झाल्या. ईशांत शर्माने पाच फलंदाजांना माघारी धाडले.
भारताने केलेल्या 297 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर कार्लोस ब्रेथवेट याला केवळ 14 धावांवर बाद करत ईशांतने भारताला दमदार सुरवात करुन दिली. त्यानंतर रोस्टन चेस आणि शेय होप वगळता विंडीजच्या कोणत्याच फलंदाजांला मैदानावर तग धरता आला नाही.
भारताकडून जसप्रति बुमरा, रवींद्र जडेजा आणि आणि महंमद शमी यांना प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले तर ईशांतने कसोटी कारर्किदीत नवव्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने ब्रेथवेट, चेस, होप, शिम्रॉन हेटमायर आणि केमार रोट यांना बाद केले. भारताकडे सध्या 108 धावांची आघाडी आहे.
दरम्यान भारताच्या डावात अष्टपैलू खेळाडू म्हणून अंतिम संघात स्थान देण्यात आलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजीतील जबाबदारी चोख पार पाडली. त्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 297 धावांपर्यंत मजल मारली.
पावसाच्या लपंडावात झालेल्या पहिल्या डावाच्या खेळात भारताने 6 बाद 203 धावा केल्या होता. रिषभ पंत आणि जडेजा यांनी आजचा खेळ सुरू केला; पण आशादायी चित्र निर्माण करून पंत नेहमीप्रमाणे बाद झाल्यावर जडेजाने अखेरपर्यंत किल्ला लढवला, त्यामुळे जेथे अडीचशे धावा कठीण वाटत होत्या, तेथे त्रिशकी धावांच्या जवळ मजल मारता आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.