ICC ODI World Cup : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपला अवघे काही आठवडे राहिले आहेत. रोहित सेना आशिया कपमध्ये आपल्या तलवारीची धार तपासून पाहत आहे. एकंदरीत बांगलादेशविरूद्धचा अपवाद वगळता रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आश्वासक कामगिरी केली आहे. (Sourav Ganguly Rahul Dravid)
विशेष म्हणजे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? विकेट किपर म्हणून कोणाला संधी मिळणार या प्रश्नांची बऱ्यापैकी उकल झाली आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये केएल राहुलच भारताचा यष्टीरक्षक असेल.
दरम्यान, राहुलच्या विकेटकिपिंग करण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर 2003 च्या वर्ल्डकपच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यावेळी देखील तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने राहुल द्रविडला विकेटकिपिंग करायला लावली अन् त्याचा फायदा आपल्याला वर्ल्डकपमध्ये झालेला दिसला.
गांगुलीच्या नेतृत्वाखालील वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची बांधणी पक्की केली असतानाही, एक अडचण कायम होती. विकेटकिपर म्हणून कोणाला घ्यायचे हे काही केल्या निवड समिती आणि कर्णधार सौरभ गांगुलीला ठरवता येत नव्हते. नयन मोंगियाचा सूर्यास्त झाल्यात जमा होता, समीर दिघे आणि पार्थिव पटेल असे काही पर्याय होते, पण १००% समाधान वाटत नव्हते. अशा वेळी कर्णधार गांगुलीने नवी शक्कल लढवण्याचा धाडसी विचार केला. त्याने राहुल द्रविडलाच यष्टिरक्षकाची देखील भूमिका करण्यास भाग पाडले.
अगोदरच्या काही सामन्यांत गांगुलीने राहुल द्रविडला एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. त्यामुळे विश्वकरंडकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत बदली यष्टिरक्षक घेणे त्याला धोक्याचे वाटले. द्रविड फलंदाज म्हणून संघात होताच. शिवाय त्याला यष्टिरक्षकही केल्याने सामन्यात एक अधिक फलंदाज खेळविणे शक्य होणार होते, म्हणजेच फलंदाजीच्या आघाडीवर भारताची बाजू भक्कम राहणार होती. द्रविडने देखील हे आव्हान स्वीकारले.
भारताच्या पहिल्या सामन्याअगोदर दक्षिण आफ्रिकेतील पर्ल गावी गांगुली - द्रविड यांची पहिली पत्रकार परिषद झाली तेव्हा गांगुली बोलत असताना द्रविड यष्टिरक्षक करतो तशी हाताची हालचाल करत होता. एखादी गोष्ट करायची ठरवली की द्रविड त्यामध्ये स्वतःला कसा झोकून देतो याचे ते उत्तम उदाहरण होते. द्रविडने दुहेरी भूमिका पार पाडल्याने गांगुलीला सात फलंदाजांना खेळवता आले होते. संपूर्ण स्पर्धेत गांगुलीने फक्त १२ खेळाडू डोक्यात ठेवले, ज्यातून ११ खेळाडू निवडले.
अनिल कुंबळे आणि हरभजनसिंगला आलटून पालटून खेळवताना संजय बांगर, अजित आगरकर आणि पार्थिव पटेल या राखीव खेळाडूंना गांगुलीने एकाही सामन्यात संधी दिली नाही. संघातील १० खेळाडू २००३ स्पर्धेतील सर्व सामने खेळले ही आकडेवारी आज मागे वळून बघताना मजेदार वाटते. राहुल द्रविडने उपकर्णधारपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली, तसेच सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना संघाला मजबुती दिली आणि यष्टिरक्षक म्हणूनही वाहवा मिळविली. अशी झोकून देणारी वृत्ती असणारा द्रविडसारखा खेळाडू शोधूनच सापडतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.