नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारताच्या पराभवाची कारणे शोधली जाऊ लागली आहेत. पराभवाचे खापर कुणावर फोडले जाईल सांगता येत नाही. पण, संघ व्यवस्थापनाला लक्ष्य केले जात आहे. यात माजी खेळाडू युवराजनेही उडी घेतली आहे. संघ व्यवस्थापन निर्णय घेण्यात चुकले, असे त्याने म्हटले आहे.
भारताने स्पर्धेच्या पूर्वीपासून चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. विजय शंकरला निवडून त्यांनी उत्तर मिळाल्याचे सांगितले. मात्र, त्याला अर्ध्यातूनच परतावे लागले. लगोलग रिषभ पंतला पाठविण्यात आले. त्याची मात्राही चालली नाही. युवराज म्हणाला, ""चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा उगाच बाऊ करण्यात आला. ही जागा महत्त्वाची होती, तर सुरवातीपासून चर्चेत असणाऱ्या अंबाती रायुडूला का वगळण्यात आले.
त्याच्यावर अन्याय झाला. दुसरा खेळाडू जखमी झाल्यावरही रायुडूला संघात स्थान मिळाले नाही. यावरूनच रायुडूला घ्यायचेच नाही हे जणू ठरले असावे.''
संघातील खेळाडूची क्रमवारी कुठलीही असू देत त्याला बॅक-अप खेळाडू असायलाच हवा, असे सांगून युवराज म्हणाला, "विश्वकरंकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूचा पर्याय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनासमोर असायला हवा होता. या प्राथमिक गोष्टीतच ते अपयशी ठरले. त्यांना खेळाडूंची माहिती नव्हती, असेच आता वाटू लागले आहे. निवड समितीने रायुडूवर अन्याय केला, हे निश्चित.''
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.