‘पालन’गोष्टी : स्वातंत्र्याला जबाबदारीचं कोंदण

‘जा तुला जे करायचंय ते कर जा. आई-वडिलांची किंमतच वाटत नसेल, तर आम्ही तरी काय सांगणार? स्वत:च्या मनाचं काय ते करा.’ बाबा पार वैतागून बोलत होते.
Parents
ParentsSakal
Summary

‘जा तुला जे करायचंय ते कर जा. आई-वडिलांची किंमतच वाटत नसेल, तर आम्ही तरी काय सांगणार? स्वत:च्या मनाचं काय ते करा.’ बाबा पार वैतागून बोलत होते.

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

प्रसंग १

‘जा तुला जे करायचंय ते कर जा. आई-वडिलांची किंमतच वाटत नसेल, तर आम्ही तरी काय सांगणार? स्वत:च्या मनाचं काय ते करा.’ बाबा पार वैतागून बोलत होते. धीरज ऐकत होता. त्याने स्वत:च्या आवडीच्या; पण बाबांना न आवडणाऱ्या क्षेत्रात जायचं ठरवलं होतं.

प्रसंग २

‘तुझी आवड आम्हाला मान्य आहे; पण एक गोष्ट लक्षात ठेव. आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतोय खरं; पण याची दुसरी बाजूही समजून घे. क्षेत्र जबाबदारीनं निवड आणि जबाबदारीनं काम कर. स्वातंत्र्य आलं, की जबाबदारी वाढते. उद्या तुला ही जबाबदारी झटकता येणार नाही, हे पक्कं लक्षात ठेऊन कामाला सुरुवात कर. आम्ही आहोतच सोबत.’ बाबा शांतपणे बोलत होते. मिलिंद ऐकत होता. स्वातंत्र्याला जबाबदारीचं कोंदण असलं पाहिजे, हे वडील पटवून देत होते आणि सोबत आहोत हेही सांगत होते.

घरात असे प्रसंग नेहमीच घडतात. अगदी कोणती स्कूल बॅग खरेदी करायची इथपासून ते कोणतं करिअर निवडायचं इथपर्यंत आवड आणि अपेक्षा यांचं द्वंद्व सतत सुरू असतं. पालकांच्या अपेक्षा आणि मुलांची आवड यातला संघर्ष घरोघरी पाहायला मिळतो. खूप कमी कुटुंबं अशी असतात ज्यांना निवडीचं स्वातंत्र्य आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव असते. अशा घरांत कलह होत नाहीत. उलट मोठी माणसं लहानांना जबादारीचा एक नवीन पाठ शिकवत असतात. जो त्यांनी अनुभवातून शिकलेला असतो.

आपले पालक आपणाला स्वातंत्र्य देतात म्हणजे ते आपल्यावर जबाबदारी सोपवत असतात. या जबाबदारीचं कोंदण खूप महत्त्वाचं असतं. ते नसेल तर स्वातंत्र्य आणि स्वैराचारातली सीमारेषा अधिकच पुसट होत जाते आणि स्वातंत्र्याचा अर्थच बदलून जातो. हे पालक आणि मुलं दोन्हीसाठी लागू पडतं.

इथं जबाबदारी म्हणजे ओझं नव्हे. उलट आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करताना अधिक जबाबदारीने केलं, तर आपल्याला त्याचं समाधान मिळणार आहे. मोठा आनंद मिळणार आहे. आनंदासाठीच आपण स्वातंत्र्य घेत असू, तर जबाबदारीची जाणीवही सोबत सोबत प्रवास करती झाली पाहिजे, अन्यथा त्या स्वातंत्र्याला फारसा अर्थ उरत नाही.

हे स्वातंत्र्य सहजी मिळतं का? तर नाही! त्यासाठी खरंतर स्वत:शी निरंतर वादविवाद, संघर्ष करावा लागतो. आपणाला नेमकं काय पाहिजे, याची ओळख पटावी लागते. स्वत:चा शोध घ्यावा लागतो. वक्तशीर व्हावं लागतं आणि त्याचबरोबर इतरांच्या मतांचा (भले ते अमान्य असले तरी) आदर राखायला शिकावं लागतं.

स्वत:च्या चुका आणि त्यांची दुरुस्ती याबाबत अधिक स्पष्ट असावं लागतं. वक्तशीरपणा आणि धाडस अंगी बाणवावं लागतं. त्यातून आपोआप जबाबदारीची जाणीव येऊ लागते. बेजबाबदारपणे आयुष्य उधळून देणं म्हणजे स्वातंत्र्य असतं का? की जबाबदारीने आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करत आपल्या स्वप्नांना पूर्ण होताना पाहणं म्हणजे खरं स्वातंत्र्य, हे आपण नीटसं ठरवलं पाहिजे.

स्वातंत्र्य आलं, की जबादारी येतेच आणि जबाबदारी ही मोठी गोष्ट असते. तुम्ही पालक आहात म्हणून तुम्हाला ती नाकारता येत नाही आणि तुम्ही मुलं आहात म्हणून तुम्हाला ती टाळता येत नाही. पालक आणि मुलं यांच्या स्वातंत्र्यपूर्ण जबाबदार नात्याचं नावच तर जीवन आहे. कारण ही नातीच तर जीवनाचा अविभाज्य भाग असतात. ती अधिक स्वातंत्र्यपूर्ण आणि जबाबदार असतील तर निश्चितच जीवन सुंदर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com