
डॉ. राजश्री पाटील - प्राध्यापक, एसएनडीटी महिला विद्यापीठ
‘आमच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता असतो,’ असं कौतुकानं सांगणारी माणसं आहेत. मोठ्या शहरांमध्येसुद्धा अशी घरं अस्तित्वात आहेत. आतिथ्य करणं हा गृहस्थधर्म मानला जातो. तिथी, वार न कळवता, आगंतुकपणे येणारा तो अतिथी. पूर्वी अनाहूतपणे येणाऱ्या माणसांचंसुद्धा स्वागत केलं जायचं. एवढंच काय, अगदी पांथस्थाला सुद्धा अन्न दिलं जायचं. भारतीय संस्कृती पाहुण्यांना देव मानणारी. ‘अन्नदाता पाककर्ता सुखीभव’ असं सहज म्हणत कोणी कधीही आलं तर त्या व्यक्तीला देण्यासाठी घरात अन्न असावं ही तत्कालीन गृहिणींची धारणा होती. या धारणेमागील सकारात्मकता सुखावह आहे. जगण्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढलेला असतानाही चतकोर भाकरी/पोळी ‘उरवून’ ठेवण्याची रीत अनेक घरामध्ये पाळली जाते. ही आपली संस्कृती आहे.