Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

बिहारमध्ये विरोधी पक्षाच्या आघाडीचे नेतृत्व करणारे तेजस्वी यादव यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
Lok Sabha Election Result 2024
Lok Sabha Election Result 2024Sakal

पाटणा : केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असा ठाम विश्‍वास बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला. सत्तारुढ भाजप सत्तेतून हद्दपार होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

बिहारमध्ये विरोधी पक्षाच्या आघाडीचे नेतृत्व करणारे तेजस्वी यादव यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. अतिपरिश्रमामुळे तेजस्वी यादव यांच्या मणक्याला मार लागला असल्याने तेजस्वी यादव यांना सध्या व्हिलचेअरवरून फिरावे लागत आहे.

प्रचाराच्या रणधुमाळीतही त्यांनी व्हिलचेअरवरूनच प्रचार केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, चार जूनच्या निकालानंतर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येईल. टिव्हीवरच्या सर्वेक्षणात काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होत नसल्याबद्दल विचारले असता यादव यांनी देखील एक्झिट पोलवरच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला.

ते म्हणाले, एक्झिट पोल कोण करत आहेत, तुम्हीच मला सांगा आणि आम्ही कोणाला गांभीर्याने घ्यायला पाहिजे. वास्तविक आम्ही जनतेत काम करत आहोत आणि त्यांच्या कलाचा आम्हाला अनुभव आहे. निवडणुकीत कमी जागा मिळणार असल्याच्या शक्यतेने‘ इंडिया’ आघाडी फुटणार असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली.

या बैठकीत उपस्थित राहत आहे आणि त्यानंतरच या बैठकीचा अजेंडा काय होता, ते सांगू, असे त्यांनी स्पष्ट केले.कन्याकुमारी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित ध्यान शिबिराबाबत बोलताना त्यांनी ‘फोटो काढण्याची संधी’ म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो, अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी दिली.

तसेच आमदार तेज प्रताप यादव म्हणाले, बेरोजगारी, महागाई आणि गरिबी या मुद्दयावर मी मतदान केले आहे. मोदी यांची गॅरंटी फेल आहे. मोदी यंदा नापास झाले आहेत आणि ‘इंडिया’ आघाडीचे सरकार केंद्रात स्थापन होत आहे.

काँग्रेसकडून मोदींच्या वक्तव्याचा निषेध

तिरुअनंतपूरम: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या मताचा केरळ काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. मोदींचे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे, अशा शब्दांत केरळ काँग्रेसने प्रतिक्रिया नोंदविली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोपर्यंत ‘गांधी’ चित्रपट तयार झाला नव्हता, तोपर्यंत जगाला महात्मा गांधी माहित नव्हते, असे म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com