नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून थेट पंतप्रधानांना नोटीस न बजावता केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली असून, दोन्ही नेत्यांना येत्या २९ एप्रिलपर्यंत या नोटिशीचे उत्तर मागितले आहे.
काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील एका जाहीरसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्ये केली होती. या वक्तव्यांनी एका समाजाच्या विरोधात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची तब्बल चार दिवसांनंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली. परंतु आयोगाने थेट पंतप्रधानांना नोटीस न देता पक्षाच्या ‘स्टार प्रचारकां’नी प्रचार करताना आदर्श निवडणूक आचार संहितेचे पालन करायला पाहिजे, असा सल्ला आयोगाने दिला आहे. स्टार प्रचारकांना व्यक्तिगतरीत्या जबाबदार धरले पाहिजे, असा आग्रह काँग्रेसने धरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या नोटिशीमध्येही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून आपण स्टार प्रचारकांना आदर्श निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याचे निश्चितपणे निर्देश दिले पाहिजेत. आपल्या स्टार प्रचारकांनी वाणीवर संयम राखला पाहिजे. त्यांची ही वक्तव्ये ही आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने १९ एप्रिलला तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी १८ एप्रिलला कोट्टायम येथे केलेल्या भाषणाच्या विरोधात ही तक्रार भाजपने दाखल केली आहे.
भाजप अध्यक्षांना मिळालेली ही पहिलीच अशाप्रकारची नोटीस आहे. यापूर्वी भाजपचे नेते दिलीप घोष यांनी केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. दिलीप घोष यांनी अपमानास्पद, आक्रमक व निंदास्पद वक्तव्ये केल्याचे या नोटिशीमध्ये म्हटले होते. त्याचप्रमाणे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर केलेल्या टिपणीवर नोटीस बजावली आहे.
‘महिलांचा अनादर होऊ नये’
स्टार प्रचारकांकडून वारंवार निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणे, ही चिंताजनक बाब असल्याचे निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पाठविलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे. नेत्यांकडून महिलांबद्दल होत असलेल्या हीन पातळीवरच्या वक्तव्याची दखल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी घ्यावी. निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून महिलांचा अनादर करण्याची परवानगी देऊ शकत नाही, असेही यात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.