Rahul Gandhi : हे सरकार जनतेचे नव्हे, अदानींचे ; साकोलीतील सभेतून राहुल यांचा घणाघात,शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचीही ग्वाही

‘भारतातील बावीस धनाढ्य व्यक्ती या ७० टक्के संपत्तीच्या मालक आहेत. गेल्या दहा वर्षांत सरकारने धनाढ्यांसाठीच काम केले असून, केंद्र सरकार जनतेचे नव्हे, तर अदानींचे आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर लष्कर भरतीची अग्निवीर योजना रद्द करू आणि शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देऊ,’’
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal

साकोली (भंडारा) : ‘‘भारतातील बावीस धनाढ्य व्यक्ती या ७० टक्के संपत्तीच्या मालक आहेत. गेल्या दहा वर्षांत सरकारने धनाढ्यांसाठीच काम केले असून, केंद्र सरकार जनतेचे नव्हे, तर अदानींचे आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर लष्कर भरतीची अग्निवीर योजना रद्द करू आणि शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देऊ,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आज झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास धनाढ्यांसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांसाठी काम करील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

आपल्या मुद्देसूद भाषणात राहुल यांनी विविध मुद्द्यांना हात घालताना काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांवरही भाष्य केले. ‘‘काँग्रेसचा जाहीरनामा हा महिला, युवक, मजूर, वयोवृद्ध, गरीब, आदिवासी, बेरोजगार इत्यादी घटकांशी बोलून, त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर तयार करण्यात आला आहे, म्हणूनच हा काँग्रेसचा नव्हे तर जनतेचा जाहीरनामा आहे,’’ असे राहुल म्हणाले.

‘‘आज देशातील २२ धनाढ्य व्यक्ती सरकार चालवीत आहेत. त्यात अदानी यांचे नाव सर्वांत वरचे आहे. मोदी सत्तेत आल्यापासून अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरची किंमत झपाट्याने वाढली. सरकारने मुंबईच्या विमानतळाची प्रथम सीबीआय चौकशी केली आणि त्यानंतर हे विमानतळ अदानींच्या ताब्यात दिले. केवळ विमानतळच नव्हे तर मोठमोठी बंदरे, खाणींवर अदानींचा ताबा आहे. खाणी त्यांच्या, कोळसा त्यांचा, वीजही त्यांच्याच मालकीची आहे. त्यामुळे केंद्र सरकार मोदींचे नव्हे तर अदानींचे असून पंतप्रधान चोवीस तास त्यांच्यासाठीच काम करतात,’’ अशी टीका राहुल यांनी केली.

धर्माच्या नावावर जनतेची दिशाभूल

‘‘ पंतप्रधान मोदी चोवीस तास धर्म, जातींचे नाव घेत राजकारण असतात. ते कधी मंदिरात दिसतात तर कधी समुद्रात पूजा करताना दिसतात. कधी एकदम विमानातून भरारी घेत असतात. हे सर्व जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि धर्माच्या आधारावर दिशाभूल करण्यासाठी ते करीत असतात.

मोदींचे काम तुमचे लक्ष विचलित करण्याचे तर अदानींचे काम तुमच्या खिशातून पैसा काढण्याचे आहे,’’ अशी घणाघाती टीका केली. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेव थोरात, माणिकराव ठाकरे, भंडाऱ्याचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोलीचे उमेदवार नामदेव किरसान, नागपूरचे विकास ठाकरे, चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर, रामटेकचे श्यामकुमार बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

‘‘आज देशात ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत ही पदे भरली नाही. आज देशात बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्या आहे. पंतप्रधान मोदी सर्व विषयांवर बोलतात पण बेरोजगारीवर बोलत नाहीत. आमची सत्ता येताच ३० लाख जागा भरण्यात येतील,’’ असे आश्वासन त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com