Ratnagiri-Sindhudurg Constituency Lok Sabha Election Result: रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेच ठरले बाहुबली! ठाकरे गटाच्या राऊतांचा पराभव
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार नारायण राणे यांना ४ लाख ४८ हजार ५१४ मते मिळाली आहेत. तर ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना ४००६५६ मते मिळाली आहेत. नारायण राणे यांचा ४७ हजार ८५८ मतांनी विजय झाला आहे.
शिवसेनेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ अस्तित्वाची लढाई होती. या मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान आमदार विनायक राऊत मैदानात होते. तर भाजप एकनाथ शिंदे गटाकडून हा मतदारसंघ हिसकवण्यात यशस्वी ठरली. त्यामुळे उशीराने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. कधीकाळी महाराष्ट्र शिवसेनेकडून मुख्यमंत्री असलेले राणे विरुद्ध ठाकरे गटाचे राऊत यांनी ही निवडणूक गाजवली. सिंधुदुर्ग हा राणेंचा गड आहे तर रत्नागिरी विनायक राऊतांचा गड आहे. त्यामुळे राणे रत्नागिरी ठाण मांडून बसले होते.
मतदानात चांगली वाढ
कोकण हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर कोकणातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ६४ चक्के मतदान झाले. २०१९ च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी ६१.९९ टक्के होती. तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाली.
यावेळी ४ लाख ८ हजार ७४५ परुष, तर ३ लाख ९८ हजार ८१६ इतक्या महिला अशा एकूण ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५२.६२ टक्के मतदान झाले. तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ४९.८३ टक्के मतदान झाले. राजापूर विधानसभा मतदारसंघात ४७.३१ टक्के मतदान झाले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ५५.१४ टक्के, कुडाळ मतदारसंघात ५९.०९ आणि सावंतवाडी मतदारसंघात ६९.०३ टक्के मतदान झाले आहे.
२०१९ च्या मतदानाची आकडेवारी -
विनायक राऊत (शिवसेना) ४,५४,०२२ मते मिळाले होते. त्यांना विजयी मिळाला होता. तर डॉ. निलेश राणे (स्वाभिमानी पक्ष) यांना २,७९,७०० मते मिळाली होती. आता निलेश राणे भाजपात आहेत. काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना ६३,२९९ तर वंचित आघाडीचे मारुती जोशी ३०,८८२ मते मिळाली होती. त्यामुळे १,७४,३२२ मतांनी विनायक राऊत यांचा विजय झाला होता.
विधानसभांची परिस्थिती -
२००८ साली निर्माण करण्यात आलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सध्या रत्नागिरी जिल्ह्यामधील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर हे रत्नागिरीमधील तर सिंधुदुर्गमधील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
या मतदारसंघातील लढतीचा विचार केला तर गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती. येथील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण व कणकवली वगळता रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या चार मतदार संघांमध्ये ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार होते. २०२२च्या मध्याला शिवसेनेत फूट पडल्यानंतर या चारजणांपैकी रत्नागिरी व सावंतवाडीचे आमदार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले.
यावेळी निवडणुकीत कोणते मुद्दे गाजले -
कोकणात रोजगाराचा भीषण प्रश्न आहे. यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक उद्योग बाहेरील राज्यात जात आहेत. पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न देखील मोठा आहे. रिफायनरी समर्थन आणि विरोध हा मुद्दा देखील समोर आला. महागाई, मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छिमारांच्या अडचणी वाढणार आहेत. हे मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

