'सांगली लोकसभा मतदार संघातील वस्तुस्थिती काँग्रेस नेते व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा बघावी, माहिती घ्यावी आणि उमेदवारीबाबत फेरविचार करावा.'
पलूस : ‘‘सांगली लोकसभा मतदार संघातील (Sangli Lok Sabha Constituency) वस्तुस्थितीच्या आधारावर ही जागा काँग्रेसलाच (Congress) मिळायला हवी होती. अद्याप वेळ गेलेली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निर्णयावर फेरविचार करावा,’’ असे आवाहन आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. ‘‘दोन-तीन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करू, त्यांची भावना जाणून घेऊ, त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
येथे आमदार विश्वजित यांच्यासह आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील (Vishal Patil), जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. विश्वजित म्हणाले, ‘‘देशात जातीयवादी भाजप सरकारच्या कालावधीत बेरोजगारी, महागाई, महिलांवरील अन्याय वाढला आहे. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तयार झाली. त्यातील जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करत होतो.
सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी पक्षाचा एक आमदार, तसेच सरपंच, सदस्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पदाधिकारी निवडून येतात. मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. ही सर्व वस्तुस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीतील नेते, प्रभारी; तसेच महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदींना सांगितली, तरी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली.’’
ते म्हणाले, ‘‘आम्ही पुन्हा काँग्रेस श्रेष्ठी व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे ‘सांगली’च्या जागेबाबत आग्रह धरला. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटालाच जाहीर केली. त्यामुळे आमच्यासह काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरे व काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे.
सांगली लोकसभा मतदार संघातील वस्तुस्थिती काँग्रेस नेते व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा बघावी, माहिती घ्यावी आणि उमेदवारीबाबत फेरविचार करावा. माझ्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. येत्या काळात कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून त्यांची समजूत काढून, सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.