'हातकणंगले मतदारसंघातून जर निवडणूक लढवण्यास सांगितले, तर शौमिका महाडिक लोकसभेची निवडणूक या मतदारसंघातून लढवतील, मात्र याचा अंतिम निर्णय पक्षातील वरिष्ठ घेतील.'
कोल्हापूर : ‘ज्यांच्यामुळे गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) जागा निवडून आल्या, ते आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची राज्यात एकही जागा निवडून येणार नाही,’ असे भाकीत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखी झाले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येतील, असेही खासदार महाडिक प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाकडे आता नेतृत्व राहिलेले नाही. गेल्या निवडणुकीत ज्यांच्या जीवावर ते निवडून आले ते आता भाजपमध्ये (BJP) आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. राज्यातील जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे.
महायुतीमधील (Mahayuti) पक्षांचे सर्व नेते मिळून उमेदवारही ठरवतील. कोल्हापुरातील दोन्ही जागांबाबत गुरुवारी (ता.२८) घोषणा होईल. दोन्ही पैकी एक मतदारसंघ भाजपला मिळावा, असा आमचा आग्रह आहे, मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. महायुतीची सभा घेऊन आमच्या प्रचाराला सुरुवात होईल. पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन सभा व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
‘वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीमध्ये झाला नाही. त्यामुळे त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या काही जागांना पाठिंबा दिला आहे. तसा तो भाजपलाही त्यांनी द्यावा. ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीचे अधिक नुकसान होणार आहे,’ असेही महाडिक म्हणाले.
‘जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक भाजपला मिळावा, अशी आमची मागणी आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांचे नाव निश्चित झाल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. हातकणंगले मतदारसंघातून जर निवडणूक लढवण्यास सांगितले, तर शौमिका महाडिक लोकसभेची निवडणूक या मतदारसंघातून लढवतील, मात्र याचा अंतिम निर्णय पक्षातील वरिष्ठ घेतील. महायुतीचे जो उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू’, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.