Chiplun Election : शरद पवारांची रद्द झालेली 'ती' सभा शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडली अन् भास्कर जाधव विजयी झाले!
रमेश कदमांनी ती निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सभा घेण्याचे ठरले होते.
-शौकत मुकदम
Chiplun Assembly Elections : निवडणुकीच्या रणांगणात नेत्यांच्या जाहीर सभा हा जय-विजयाच्या माहोलवर दूरगामी परिणाम करणाऱ्या असतात. एखादी सभा जनमानसाची नस पकडते आणि पाहता पाहता सारे वारे फिरून जाते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची चिपळूणमध्ये ठरलेली सभा रद्द (Chiplun Sabha) झाली आणि त्याचा फटका राष्ट्रवादीचे त्या वेळचे उमेदवार रमेश कदम यांना बसला.
पवारांची रद्द झालेली सभा शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडली, अशी चर्चा तेव्हा रंगली होती. शरद पवार मोटारीने चिपळूणला आले असते तरी त्या वेळचा निकाल वेगळा लागला असता, असा अंदाज बांधला गेला. शरद पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेस (Congress) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाचे स्वतंत्र उमेदवार दिले होते.
चिपळूणमधून रमेश कदम राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्यासमोर शिवसेनेकडून विद्यमान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना तिकीट मिळाले होते. रमेश कदम यांच्याकडे उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे सदस्यपद होते, तसेच चिपळूण शहराच्या नगराध्यक्षपदाचा दीर्घ कालावधीचा अनुभव त्यांच्याकडे होता. त्यामुळे चिपळूणमध्ये दोन्ही उमेदवारांनी एकमेकांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. रमेश कदमांनी ती निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सभा घेण्याचे ठरले होते. सभेची जय्यत तयारी झाली होती.
शहर आणि ग्रामीण भागातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सभेसाठी आले होते. शरद पवार पाटणची सभा संपल्यानंतर हेलिकॉप्टरने चिपळूणला येणार होते. त्यासाठी पवन तलाव मैदानावर हेलिपॅडही तयार करण्यात आले होते. पाटणची सभा संपल्यानंतर पवार चिपळूणकडे निघण्यासाठी तयार झाले; मात्र त्यांना हवामान खराब असल्याच्या सूचना मिळाल्या. त्यामुळे पवारांचे हेलिकॉप्टर उडालेच नाही. चिपळूणची सभा रद्द झाली. सभेसाठी आलेले कार्यकर्ते माघारी परतले. त्याचा परिणाम मतदानावर झाला आणि भास्कर जाधव चिपळूणमधून दुसऱ्यांदा आमदार झाले.