National Anthem : 'या' मराठी खासदारामुळेच संसदेत राष्ट्रगीत गायला झाली सुरुवात..
संसद ही देशाची सर्वोच्च कार्यप्रणाली असते. पण, ही प्रथा भारतात दिसत नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले आणि भाजपच्या तिकिटावर खासदार झालेले रामभाऊ नाईक (Rambhau Naik) यांच्या लक्षात आले.
भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ (Jan Gan Man) आणि राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ हे आपल्या भारत देशाचा इतिहास आणि परंपरा दर्शवितात. यातून देशाच्या वेगवेगळ्या भागांची ओळख स्पष्ट होत असून देशवासीयांना एकतेचा संदेशही दिला जातो. आज शाळेपासून ते आता पिक्चरच्या थिएटरमध्ये सगळीकडेच राष्ट्रगीत (National Anthem) गायले जाते. मग याला अपवाद आपल्या भारताची संसदसुद्धा नाही. तिथेही हे गीत वाजवलं जातं.
भारत जेव्हा इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र होत होता, तेव्हा म्हणजेच १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पहिल्यांदा संविधान (Constitution) सभेची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाला ‘जन-गण-मन’ गायले गेले. पण, पुढे ही प्रथा सुरू राहिलीच नाही. संसद अधिवेशनाच्या सुरुवातीला जस जन-गण-मन गायले जावे. तसेच समारोपाच्या वेळी वंदे मातरम् गायले जावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. आणि यासाठी उजाडावं लागलं होतं १९९१.
काही देशांमध्ये त्यांच्या देशांच्या संसदेमध्ये त्यांच्या त्यांच्या देशाचे राष्ट्रगीत म्हणण्याची प्रथा आहे. आणि संसद ही देशाची सर्वोच्च कार्यप्रणाली असते. पण, ही प्रथा भारतात दिसत नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले आणि भाजपच्या तिकिटावर खासदार झालेले रामभाऊ नाईक (Rambhau Naik) यांच्या लक्षात आले. आपल्याही भारताच्या संसदेमध्ये राष्ट्रगीत म्हटले जावे, असे रामभाऊंना मनोमन वाटले. लागलीच त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने तसे पाऊल उचलायचे ठरवलं. याकरिता रामभाऊंनी संसदेत प्रस्ताव आणायचं ठरवलं.
याकरिता योग्य त्या संसदीय मार्गाचा अवलंब करूनच आपली ही कल्पना त्यांनी मांडली. प्रस्ताव जेव्हा संसदेत चर्चेला ठेवला गेला तेव्हा काही खासदारांकडून या प्रस्तावाला अनुमोदन मिळालं तर काहींनी याला विरोध केला. त्यानंतर या प्रस्तावावर जेव्हा चर्चा सुरू झाली, त्यावेळेस जन-गण-मन म्हटलं जावं कि वंदे मातरम म्हटलं जावं यावर चर्चा सुरू झाली. चर्चा एवढ्यावरच थांबली नाही तर संसद सुरू होण्याच्या वेळी राष्ट्रगीत म्हंटले जावं की राष्ट्रीय गीत म्हटलं जावं, यावर ही चर्चा येऊन पोहोचली. विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होत की, जर राष्ट्रगीत वाजवायला सुरुवात करायला हरकत नाही.
मात्र, देशाच्या सर्वोच्च अशा संसदेत कोणत्याही प्रकारे या राष्ट्रगीताच्या सन्मानाला धक्का पोहोचता कामा नये. जसं की हे गीत वाजवलं जात असताना लोकप्रतिनिधींनी स्तब्ध न उभं राहणं, चुळबुळ करणं वगैरे. त्यावर जे गीत वाजवलं जावं या पक्षात होते त्यांनी प्रत्युत्तर देताना म्हंटल कि, असा प्रकार म्हणजे लोकप्रतिनिधींमध्ये देशाभिमान नसणे असाच अर्थ होऊ शकतो. आणि लोकप्रतिनिधी हे सज्ञान असतात म्हणूनच देशाच्या सर्वोच्च सभागृहात येतात. त्यामुळे हा गीत वाजवलं जावं हा प्रस्ताव पारित करण्यात यावा. शेवटी बऱ्याच विचाराअंती हा प्रस्ताव पारित करण्यात आला. आणि असं ठरलं कि, संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी ‘जन-गण’ म्हटलं जावं तर संसदेचे कामकाज संपल्यावर वंदे मातरम्.
(लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)