पुणे : ‘‘देशातील मुस्लिम, आदिवासी, विधवा, परित्यक्ता महिलांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले. महिलांवरील अन्याय-अत्याचारातील आरोपींना सत्ताधाऱ्यांनी पाठीशी घातले. मोदी सरकारमुळेच महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सरकार हटविण्याची वेळ आता आली आहे,’’ अशा शब्दांत सामाजिक संस्थांच्या महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीला शनिवारी (ता. ४) पाठिंबा दिला.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, सत्यशोधक संस्थेच्या प्रा. प्रतिमा परदेशी, महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या ॲड. शारदा वाडेकर, एस. एम. जोशी फाउंडेशनच्या तमन्ना इनामदार, समाजवादी महिला समितीच्या ॲड. अर्चना मोरे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
परदेशी म्हणाल्या, ‘‘स्त्रियांना मोदी सरकार कधीच आपले वाटत नाही. सरकारमुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असुरक्षितता तयार झाली आहे. आम्हाला मोदींची नव्हे, तर संविधानाची गॅरंटी पाहिजे. आदिवासी, मागासवर्गाला पुढे आणण्याचे सरकारचे धोरण कधीच नव्हते.’’ मोघे म्हणाल्या, ‘‘मणिपूरमधील घटनेत महिलांची नग्न धिंड काढूनही त्यांना सरकार न्याय देऊ शकले नाही. देशात दहा वर्षांत महिलांवरील अत्याचार वाढले असून आरोपींच्या बाजूने सत्ताधारी उभे राहतात. देशात असुरक्षिततेचे वातावरण वाढत आहे.’’
वाडेकर म्हणाल्या, ‘‘अनेक महिलांवर बलात्कार करणाऱ्या रेवण्णासाठी मोदींनी मते मागितली. सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार लैंगिक शोषण करत आहेत. म्हणूनच हे सरकार महिला, दलित, आदिवासींना न्याय देऊ शकत नाही.’’ मुस्लीम समाजाविषयी पसरविला जाणारा विद्वेष व महिलांवरील अन्यायाबाबतचे मुद्दे इनामदार यांनी मांडले; तर महिलांच्या प्रश्नांची मांडणी मोरे यांनी केली. काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी परिषदेचे संयोजन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.