नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातत्याने द्वेष करण्यावर भर दिला. आम्ही मात्र प्रेमावर भर दिला. अखेरीस प्रेमाचाच विजय होईल, असा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर गांधी यांनी आज मोदींवर टीकास्त्र डागले.
दोन तगड्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये चांगला मुकाबला झाला, असे गांधी यांनी या वेळी नमूद केले. ""पंतप्रधान मोदींनी सातत्याने द्वेषपूर्ण प्रचार केला. मात्र, कॉंग्रेसने प्रचारात प्रेमावर भर दिला. या लढाईत अखेरीस प्रेमाचाच विजय होईल, असा मला विश्वास आहे,'' असे गांधी म्हणाले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. या वेळी त्यांच्यासोबत दिल्लीतील कॉंग्रेसचे उमेदवार अजय माकन उपस्थित होते.
ही निवडणूक मुख्यत्वे तीन ते चार मुद्यांवर लढली गेली. हे मुद्दे कॉंग्रेसशी नव्हे; तर लोकांशी निगडित होते. त्यात बेरोजगारी हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता. त्याखालोखाल शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीचा मुद्दा होता. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाची शक्ती आणि अर्थव्यवस्थेवर घातलेला घाला हे मुद्दे होते, असे गांधी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला किती जागा मिळतील, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गांधी म्हणाले की, याविषयी मी बोलणार नाही. लोकशाहीत नागरिकच सर्वश्रेष्ठ असतात, त्यामुळे कोण जिंकणार, हे मतदारच ठरवतील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.