Loksabha 2019 : औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Loksabha 2019 :  औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई - औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र काल मध्यरात्री ते अचानक गिरीश महाजन यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अब्दुल सत्तार यांच्यात बराच काळ चर्चा झाली.

२० वर्षांपासून अब्दुल सत्तार हे आमदार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील काँग्रेस पक्ष आणि स्थानिक राजकारणात सत्तार यांचे वजन आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीतही मोदी लाट असूनही अब्दुल सत्तार निवडून आले होते. तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधील काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल साडेतीन लाख मते मिळाली होती. या वेळी अब्दुल सत्तार यांनीच काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे लोकसभेबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद किंवा जालन्यातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसने झांबड यांना उमेदवारी देऊ केल्यामुळे सत्तार नाराज झाले. हा निर्णय घेताना पक्षाने आपल्याला विश्वासात घेतले नाही. परिणामी, मी अपक्ष लढणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले होते. 

फडणवीस यांचे सहकार्य
या संदर्भात सत्तार म्हणाले, की मतदारसंघातील अनेक कामे करण्यासाठी, तसेच निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेचार वर्षांत चांगले सहकार्य केले होते, त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो. मी कदापिही भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. अशोक चव्हाण माझे नेते. मात्र, उमेदवार ठरविताना त्यांचे कुणीही ऐकत नसल्याने आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे यापुढे काँग्रेससोबत माझा कोणताही संबंध नाही.

सत्तारांसाठी मी माघार घ्यायला तयार : झांबड
‘‘अब्दुल सत्तार हे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हा समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनीच माझे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. त्यामुळे मला विश्‍वासात न घेता झांबड यांना उमेदवारी दिली गेली, हा त्यांचा दावा न पटण्यासारखा आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ केली होती; पण त्यांनी ती नाकारली. मग आता बंडखोरी कशासाठी? यामागे काय राजकारण आहे, हे त्यांनीच सांगावे,’’ असे प्रश्‍न काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी उपस्थितीत केले. शिवाय अब्दुल सत्तार यांची लढण्याची इच्छा असेल, तर मी माघार घ्यायला तयार आहे, असे झांबड म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com