उदगीर (जि. उस्मानाबाद) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कष्टाने काळा पैसा तिजोरीत जमा केला. याच पैशांतून देशातील गरिबांना 72 हजार रुपये देण्याची घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. मोदींनी पैसे जमवायचे आणि राहुल गांधींनी ते वाटायचे, हा प्रकार म्हणजे "आयजीच्या जिवावर बायजी उदार' असा आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
लातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी आज झालेल्या सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, 'पंतप्रधान मोदी यांनी देशाला संरक्षण दिले. एका अर्थाने ते देशाचाच विमा आहेत. आतापर्यंत देशाला अनाचारी, दुराचारी व भ्रष्टाचारी राजवट मिळाली. मोदी यांनी मात्र सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन केले. राहुल गांधी यांचे पणजोबा, आजी, वडील, आईने गरिबी हटविण्याची घोषणा केली. गरिबी हटली नाही. आता राहुल गांधीही तीच घोषणा करीत आहेत. खोटे बोल पण रेटून बोल, या पद्धतीने ते घोषणा करीत सुटले आहेत. त्यांच्या घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे.
|