Loksabha 2019 : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेवरच विधानसभेची गणिते

Politics
Politics

कोल्हापूर - जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांचा निकाल काय लागणार? यावर विधानसभेची समीकरणे निश्‍चित होणार आहेत. विधानसभेलाही युती व आघाडी निश्‍चित आहे, त्यामुळे ही निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजपात गेलेल्यांची मात्र चांगलीच कोंडी होण्याची शक्‍यता आहे.

दोन्हीही मतदारसंघांत काल चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीतील ईर्ष्या आणि झालेल्या मतदानावरून निकालाचा अंदाज बांधणे अवघड आहे; पण निकाल काहीही लागला तरी त्याचे पडसाद हे विधानसभा निवडणुकीत उमटणार हे नक्की आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागा आहेत. यापैकी सहा जागा शिवसेनेच्या आहेत, तर प्रत्येकी दोन जागांवर भाजप, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विधानसभेला युती निश्‍चित आहे, त्यामुळे उत्तरमधून भाजपचे महेश जाधव, राधानगरीतून नुकतेच भाजपात गेलेले राहुल देसाई, शिरोळचे अनिल यादव, कागलमधून समरजितसिंह घाटगे व संजय घाटगे यापैकी रिंगणात कोण राहणार? याविषयी उत्सुकता आहे. कागल हा पूर्वीपासून सेनेचा मतदारसंघ आणि संजय घाटगे हे उमेदवार ठरलेले आहेत; पण त्या ठिकाणी आता समरजितसिंह यांनी जोरदार तयारी केली आहे.

भाजपने ही जागा घेतली तर घाटगेंची सोय काय करणार? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. राधानगरीत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हेच पुन्हा उमेदवार असतील तर श्री. देसाई गट लढणार का थांबणार? शिरोळमध्ये उल्हास पाटील शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनाच उमेदवारी मिळाली तर भाजपात गेलेले अनिल यादव यांचे भवितव्य काय? असे अनेक प्रश्‍न असतील. 

युतीप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही या अडचणी आहेत. आघाडीत काँग्रेसला सहा, तर राष्ट्रवादीला चार जागा वाटून घ्याव्या लागतील. या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाल्यास त्यांना हक्काचा म्हणून शिरोळ मतदारसंघ सोडावा लागेल. या मतदारसंघात तयारी केलेले राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेसचे गणपतराव पाटील यांची भूमिका काय असेल? करवीर, राधानगरी, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, इचलकरंजी व शिरोळ हे काँग्रेसकडे; तर कागल, चंदगड, कोल्हापूर उत्तर व शाहूवाडी यावर राष्ट्रवादीचा दावा असेल. हातकणंगले, इचलकरंजीत काँग्रेसकडून अनुक्रमे राजू आवळे व प्रकाश आवाडे असतील. 

राधानगरी राष्ट्रवादीकडे कायम रहावा यासाठी प्रयत्न असतील. ही जागा मिळाली तर राष्ट्रवादीकडून के. पी. पाटील की ए. वाय. पाटील हा वाद राहणारच आहे. चंदगड राष्ट्रवादीकडे गेला तर माजी मंत्री भरमू पाटील व ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांची बंडखोरी निश्‍चित आहे. शाहूवाडीत दोन गायकवाड गट एकत्र येणे आव्हान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून मानसिंगराव गायकवाड यांना रिंगणात उतरले जाईल की ‘जनसुराज्य’ला पाठिंबा दिला जाईल, यावर कर्णसिंह गायकवाड व त्यांच्या गटाची भूमिका अवलंबून आहे. 

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सध्या तरी प्रबळ उमेदवार नाही. ही जागा काँग्रेसकडे गेली तर आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज किंवा माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांची नावे उमेदवारीच्या स्पर्धेत असतील. राष्ट्रवादीकडेच ही जागा राहिली तर शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या व्यतिरिक्त दुसरे नाव पुढे येत नाही. कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात काँग्रेसकडून पुन्हा सतेज पाटीलच रिंगणात उतरतील, अशी शक्‍यता आहे. इचलकरंजीत आमदार सुरेश हाळवणकर व त्यांचे पारंपरिक विरोधक माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यातील सामना निश्‍चित आहे. हातकणंगलेतही आमदार डॉ. सुजित मिणचेकर विरुद्ध काँग्रेसचे राजूबाबा आवळे, ‘जनसुराज्य’चे माजी आमदार राजीव आवळे अशा तिरंगी लढतीची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com