भुसावळ - देशात पैशांची कमी नाही. देश धनवान आहे, पण जनता मात्र गरीब आहे. कॉंग्रेस पक्ष हा विश्वासघातकी व बेईमानांचा पक्ष आहे. यांनी देशाचा सत्यानाश केला, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज कॉंग्रेसवर तोफ डागली.
गडकरी हे भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारानिमित्त संतोषीमाता सभागृहात आयोजित सभेत बोलत होते. गडकरी म्हणाले, की खासगी कंपन्या गुंतवणूक करायला तयार असताना कॉंग्रेसने 70 हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी केली. हेच पैसे सिंचनासाठी खर्च केले असते, तर आज महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त झाला असता. पर्यायाने शेतीला पुरेसे पाणी मिळून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. यासाठी नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तींच्या हातात सत्ता देणे आवश्यक आहे. कारण तेच या देशाला योग्य नेतृत्व व दृष्टिकोन देऊ शकतात.
कॉंग्रेसचीच गरिबी हटली
पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहनसिंग या सर्वांनी आणि आता राहुल गांधी यांनीही "गरिबी हटाव' असा नारा दिलेला आहे. समाजात आजही फार मोठी दरी आहे. आतापर्यंत गरिबी जर कोणाची हटली असेल, तर ती कॉंग्रेसच्या चेल्याचपाट्यांचीच, अशी टीकाही गडकरी यांनी या वेळी केली.
|