विधान परिषद निवडणूक : कोण होणार विजयी, दानवे की कुलकर्णी? गुरुवारी निकाल

अंबादास दानवे, बाबूराव कुलकर्णी
अंबादास दानवे, बाबूराव कुलकर्णी

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 19) मतदान झाले आणि घोडेबाजाराची चर्चा रंगायला सुरवात झाली. एकूण 657 पैकी 647 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला. औरंगाबादेतील तीन तर जालन्यातील सात जणांनी मतदानाला दांडी मारली. दरम्यान, महायुतीचे अंबादास दानवे की आघाडीचे बाबूराव कुलकर्णी यापैकी कोण विजयी होणार, याचा निकाल आता गुरुवारी (ता.22) दुपारपर्यंत लागेल. सकाळी आठ वाजता चिकलठाणा मेट्रॉन कंपनीमध्ये मतमोजणीस सुरवात होणार असून, अवघ्या अडीच तासांत निकाल हाती येणार आहे. 

सर्वच पक्ष सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी होत असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व आहे. महिनाभरापासून औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. चर्चेत असलेली नावे अचानक स्पर्धेतून बाहेर गेली आणि महायुतीकडून दानवे, तर आघाडीकडून कुलकर्णी यांची लॉटरी लागली. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष झांबड यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याने उमेदवारीची माळ कुलकर्णी यांच्या गळ्यात पडली; तर युतीकडून खोतकर, वैद्य, त्रिवेदी यांच्यावर मात करीत दानवे यांनी बाजी मारली. 
  
महायुतीचे पारडे जड 
संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे पारडे जड आहे. विजयासाठी आवश्‍यक असलेले बहुमत जवळ असतानाही दानवे यांनी अतिरिक्त मतांची जमवाजमव करीत स्वतःला सुरक्षित करून घेतले. त्यामुळेच महायुतीचे दानवे हे विक्रमी मतांनी निवडून येतील असा दावा केला जात आहे. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षाचे मिळून 333 सदस्य आहेत. याशिवाय कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार समर्थक चाळीसहून अधिक सदस्यही दानवे यांच्या पाठीशी उभे राहिले, अशी चर्चा होती. आघाडीकडील 250 कुलकर्णींना पडतील का, असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता. 
 
एमआयएमच्या सदस्यांनी बजावला हक्क 
एमआयएमच्या 29 सदस्यांपैकी 28 जणांनी आपल्या मताचा अधिकार बजावला. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात लढूनच एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता. वैचारिकदृष्ट्या शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्याशी एमआयएमचे पटत नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती. अशावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज यांनी नगरसवेकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले, अशी चर्चा होती. 
 
मतीन बेड्यांसह मतदानाला 
एमआयएमचा निलंबित व सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुगांत असलेला नगरसेवक सय्यद मतीन यानेही मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी एकच्या सुमारास मतीन यास बेड्यांसह पोलिस बंदोबस्तात मतदानासाठी आणण्यात आले होते. 
 

असे आहे पक्षीय बलाबल
महायुती 330
कॉंग्रेस-आघाडी 250 
एमआयएम, बसप, अपक्ष 77 
एकूण 657 
झालेले मतदान
पुरुष  321 
स्त्री 326 
एकूण 647 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com