नगर : राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्षलागवडीला मोठा प्रतिसाद मिळाला. महिनाभर राबविलेल्या या अभियानात राज्यात 15 कोटी 88 लाख 71 हजार 352 वृक्षलागवड झाली. ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा 22.13 टक्के अधिक वृक्षलागवड झाली. वृक्षलागवडीत चार जिल्हे दुपटीने पुढे आहेत.
सरकारने तीन वर्षांपासून वृक्षलागवड मोहीम सुरू केली. गेल्या तीन वर्षांचा अनुभव पाहता, यंदा मुंबईसह 36 जिल्ह्यांत 13 कोटी 84 हजार 101 वृक्षलागवड करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार राज्यात एक ते 31 जुलैदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. त्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण व अन्य सरकारी विभागांसह शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. त्यामुळे वृक्षलागवडीला मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यात 15 कोटी 88 लाख 71 हजार 352 वृक्षलागवड झाली. त्यात वन विभागाने सात कोटी 23 लाख 73 हजार 166 झाडे लावली. औरंगाबाद विभागात सर्वाधिक 185 टक्के, तर सर्वांत कमी पुणे विभागात 87 टक्के व नागपूर विभागात 97.12 टक्के वृक्षलागवड झाली. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टाच्या दुप्पट वृक्षलागवड झाली. नगर जिल्ह्यात 53 लाख 44 हजार वृक्षलागवड झाली. जिल्हा परिषदेने 14 लाख 73 हजार 164 झाडे लावली. त्यासाठी 2 लाख 68 हजार 549 नागरिकांनी सहभाग घेतला.
वनमंत्र्यांकडून "सीईओ'चे स्वागत
राज्यात 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होऊन जनजागृती केली. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षलागवड झाली. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. वृक्षलागवडीचा संकल्प चार दिवस आधीच पूर्ण झाल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केले.
विभागनिहाय वृक्षलागवड
- औरंगाबाद ः 5,56,99,287
- अमरावती ः 1,86,37,507
- कोकण ः 1,58,83,429
- नागपूर ः 2,51,03,144
- नाशिक ः 2,70,08,811
- पुणे ः 1,70,39,175
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.