कोरोनात उरकले साधे विवाह! आता मानपान, हुंड्यासाठी संसारात वाढला कलह; घटस्फोटाचे २००० अर्ज

कोरोनाच्या निर्बंधात साध्या पद्धतीने विवाह उरकलेल्या मुलींच्या संसारात आता मानपान, हुंडा, संशयातून भांडणतंटे वाढले आहेत. मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दोन हजार ११७ विवाहितांनी सासरच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली आहे.
संसारात वाढला कलह
संसारात वाढला कलहsakal

सोलापूर : कोरोना आला आणि अनेकांना अनाथ, निराधार, निराश्रित करून आता शांत झाला. त्याचे दूरगामी परिणाम अजूनही दिसत आहेत. कोरोनाच्या निर्बंधात साध्या पद्धतीने विवाह उरकलेल्या मुलींच्या संसारात आता मानपान, हुंडा, संशयातून भांडणतंटे वाढले आहेत. मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दोन हजार ११७ विवाहितांनी सासरच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली आहे.

अनेक पालकांनी कोरोना काळात घरी बसून असलेल्या मुलींचा विवाह साध्या पद्धतीने उरकला. त्यावेळी निर्बंध असल्याने वऱ्हाडी बोलावणे, थाटात विवाह करण्यावर बंधने होती. पालकांनी खर्च कमी होतोय, मुलीला चांगला पती मिळतोय, या आशेपोटी मुलींचे विवाह उरकले. परंतु, कोरोना काळात अनेकांची नोकरी, रोजगार गेला. त्यातून आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि मुलीच्या सासरच्यांनी वेगवेगळ्या कारणांवरून नवविवाहितांचा छळ सुरू केला. कर्ज फेडायला माहेरून पैसे आण, मुलाला व्यवसाय टाकायचा आहे, नवीन घर व वाहन घ्यायचे आहे म्हणूनही माहेरून पैसे आण म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. अनेक दिवस सासरच्यांकडून होणारा त्रास सहन न झाल्याने चार भिंतीत वावरणारी सुशिक्षित नवविवाहिता आता थेट पोलिसांत धाव घेत आहे. ज्या पतीसोबत सात जन्माची स्वप्ने पाहिली, त्याच्याविरुद्धच विवाहिता पोलिसांत दाद मागत आहेत.

बिनहुंड्याची तुला नांदवणार नाहीच

सोलापुरात दर आठवड्यात सरासरी दोन विवाहिता सासरच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतात, अशी स्थिती आहे. दरम्यान, जुळे सोलापुरातील अमृता अशोककुमार भगत यांचा विवाह १९ डिसेंबर २०२१ रोजी जयवंत पवार याच्यासोबत झाला. विवाहानंतर काही महिन्यांतच आर्थिक चणचणीमुळे कौटुंबिक वादविवाद सुरू झाले. विवाहात मानपान व्यवस्थित केला नाही, माहेरून १० लाख रुपये आण, नाहीतर तुला नांदवणार नाही म्हणून सतत संशय घेऊन पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद अमृता यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. त्यावरून पती जयवंत, सासरा बसवंतराव पवार, दीर उमेश पवार, नणंद ज्योती महंतेश चव्हाण, महंतेश चव्हाण (सर्वजण रा. नरगुंद, कर्नाटक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सुखी संसारातील कलहाची कारणे

  • विवाहात मानपान केला नाही, हुंडा, वस्तू दिल्या नाहीत

  • सुशिक्षित असूनही घरातील कामे (स्वयंपाक) जमत नाहीत, मुलगीच झाली

  • मोबाईलचा अतिवापर; विवाहितेवर संशय घेणे

  • कर्ज झालंय, व्यवसाय सुरू करायचा आहे, वाहन, घर घ्यायचे आहे

  • मुली शिकलेल्या असल्याने सासरच्या त्रासाला बळी पडत नाहीत

कोरोनानंतर वाढले घटस्फोटाचे अर्ज

कोरोनानंतर घटस्फोटाची मागणी करणाऱ्या अर्जांची संख्या दुपटीने वाढली आहे. मागील दोन वर्षांत दीड ते दोन हजार अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले आहेत. कौटुंबिक वादविवाद, विवाहातील मानपान, हुंडा, कर्जबाजारीपणा, संशय ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत.

- ॲड. रत्ना अंत्रोळीकर, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर

सुशिक्षित मुली अन्यायाविरूद्ध दाद मागतात

आताच्या मुली सुशिक्षित असून सर्वच बाबींसाठी त्या स्वत: सक्षम आहेत. सासरचा त्रास त्या निमूटपणे सहन करत नाहीत. कोरोनानंतर मानपान, हुंडा, माहेरून पैसे आण म्हणून छळाच्या घटना वाढत असून, त्याला कंटाळून विवाहिता पोलिसांत दाद मागत आहेत.

- विजया कुर्री, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला सुरक्षा कक्ष, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com