
मुंबई : फॉक्सकॉन-वेदांता सेमीकंडक्टर हा दोन लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला याबाबत अद्याप सरकारकडून कुठलाच अधिकृत खुलासा आलेला नाही असा आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊ त्यांनी याबाबत काही खुलासेही केले आहेत. तसेच शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Aditya Thackeray alleged on Shinde Fadnavis govt regarding Vedantta Project)
आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हटलं आहे. बाजीगर चित्रपटात हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है असं आहे. मात्र इथे “जीत कर हारने वाले को खोके सरकार कहते है”, असं म्हणत आदित्य यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला याची माहिती आपल्या सर्वांना कळाली. पण अजूनही यावर या सरकारकडून कुठलाच खुलासा आलेला नाही. १ लाख रोजगार उपलब्ध करुन देणारा प्रोजेक्ट असा दुसऱ्या राज्यात का गेला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्रात यायला तयार होता.
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गुंतवणूक यायला हवी. मात्र महाराष्ट्रासारख राज्य आपण मेरीटवर पुढं आणण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या मुख्यमंत्री ४० आमदारांसह दोन प्रकल्पही तिकडे घेऊन गेल्याची टीका आदित्य यांनी केली.