Kharip Sowing
Kharip Sowingsakal

Agriculture : राज्यात २० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण

राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या पूर्ण.

पुणे - राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंतच्या पेरण्यांचे हे प्रमाण केवळ १४ टक्के इतके आहे. यंदा पाऊस उशिरा सुरु झाल्याने आणि आजही पेरण्यांसाठी पुरेशा पाऊस झाला नसल्याने यंदा खरीपाच्या पेरण्यांना उशीर झाला आहे.

यामुळे मूग, उडीद, मटकी यासारखी कडधान्य पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. कडधान्यांची पेरणी वेळेत पूर्ण झाली तरच, ही पिके येतात. पुणे जिल्ह्यात पावसाने सोमवारपासून (ता.३) उघडीप दिली असल्याने आता जिल्ह्यातील पेरण्यांना सुरवात होऊ लागली आहे. मात्र भात लावणीसाठी अद्याप पुरेशा पाऊस झाला नसल्याने, भात लावणीसाठी आणखी काही काळ पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

कृषी विभागाच्यावतीने खरीप पेरण्यांसाठी बी-बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी पुरेशा प्रमाणात पाऊस होईपर्यंत पेरण्या करू नयेत. चांगला पाऊस होईपर्यंत पेरण्यांसाठी पुरेसा पाऊस पडेपर्यंत प्रतिक्षा करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

दरवर्षी जूनच्या मध्यापर्यंत पेरण्यांसाठी आवश्‍यक पाऊस पडत असतो. त्यामुळे साधारणतः जून अखेरीपर्यंत किंवा कमाल जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत खरीपाच्या पेरण्या पूर्ण होत असतात. परंतु यंदा पावसाने भर उन्हाळ्यात हजेरी लावली. पण ऐन जून महिन्यातच विश्रांती घेतली.

परिणामी जून महिन्यात साध्या धूळवाफ पेरण्याही सुरु करता आलेल्या नाहीत. जूनच्या अखेरीस पाऊस सुरु झाला असला तरी वाफसा होईपर्यंत शेतकऱ्यांना पेरण्या सुरू करता येणार नाहीत. कालपासून (सोमवार) पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे.

यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांसाठी राज्याला एकूण १९ लाख २१ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत १५ लाख ९२ हजार ४६६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत. उपलब्ध बियाणांचे हे प्रमाण एकूण गरजेच्या तुलनेत ८२ टक्के इतके आहे. खरिपासाठी ४३ लाख १३ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज लागणार आहे. यापैकी आतापर्यंत ४४.१२ लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे.

पुणे जिल्ह्यासाठी पावणेतीन लाख टन खते

पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी पावणेतीन लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि ३० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी प्रत्यक्षात आजअखेरपर्यंत ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील तेरापैकी हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांमधील मिळून जिल्ह्यातील एक हजार ३८० गावे हे खरीप गावे आहेत. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (उसासह) तीन लाख ६२ हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी खरीप पिकांसाठी एक लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.

सरासरी १४० मिलिमीटर पाऊस

राज्यात १ जूनपासून आजअखेरपर्यंत सरासरी १४०.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. राज्याचा जून महिन्याचा सरासरी पाऊस हा २३९.६ मिलिमिटर इतका आहे. यानुसार प्रत्यक्षात जून महिन्यातील सरासरी पावसाच्या ५८.८० टक्के पाऊस पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com