
अजित पवारांच्या नेतृत्वातील गटाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकावला. या बंडात विदर्भातील चार आमदार व पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांसोबत गेले आहे. पक्षाची विदर्भात फारशी संघटनात्मक शक्ती नसली तरी अनेक नेते एकतर मुंबईत आहेत किंवा ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.
अनेक जण संभ्रमात असून सध्या मौन बाळगून आहेत. पण एकंदरीत हे बंड विदर्भातील राष्ट्रवादीला ग्रहण लावणारे ठरणार आहे.
गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवारांची साथ धरत आज मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांची जी यादी राजभवनात दिली, त्यात पुसदच्या इंद्रनील नाईकांचेही नाव आहे.
आत्राम व नाईक ही दोन्ही घराणी शरद पवारांची निष्ठावान मानली जातात. त्यांनीच शरद पवार यांची साथ सोडणे काहीसे आश्चर्यकारक व वाऱ्यांची नवी दिशा दाखवणारे मानले जात आहे. विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी हेसुद्धा अजित पवारांसोबत आहे. तर भंडाराचे आमदार राजू कारेमोरे हे पटेलांचे निष्ठावान आहेत. पटेल अजित पवारांसोबत गेल्याने कारेमोरेंचीही दिशा स्पष्ट झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके हे आज मुंबईत अजित पवारांसोबत असल्याचे कळते. अन्य पदाधिकारी कुणाचेही दूरध्वनी घेत नाहीत. गोंदिया जिल्ह्यातील आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे मुंबईत आहेत. पण त्यांचा कल अजून कळलेला नाही. अकोल्यातील आमदार मिटकरी आणि विजय देशमुख हे शपथविधीला उपस्थित होते.
देशमुख, बंग बंडात नाहीत
पवार घराण्याशी निष्ठा बाळगणारे आणखी एक घराणे बुलडाणा जिल्ह्यातील शिंगणेंचे आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे सध्या खासगी कामासाठी हिमाचल प्रदेशात गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडामोडींबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.
नागपूर जिल्ह्यात अनिल देशमुख व रमेश बंग हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. मात्र, दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही. तथापि, ते या बंडात अजित पवारांसोबत सहभागी होणार नाहीत, असेच मानले जाते. हे दोघेही पवार यांचे निष्ठावान म्हणूनच ओळखले जातात.
साहेबांची बारामती दादांच्या पाठीशी
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर बारामतीत बहुसंख्य लोकांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अधिक योग्य ठरेल, असे मत बारामतीत व्यक्त केले गेले.
अजित पवार हे भाजप सरकारला पाठिंबा देणार, अशा स्वरूपाच्या बातम्या गेल्या अनेक महिन्यांपासून येत होत्या. मात्र, स्वतः अजित पवार यांनी त्या फेटाळल्या होत्या. त्यामुळे ते या सरकारला पाठिंबा देतील ,अशी लोकांची अपेक्षा नव्हती.
मात्र, आज अचानकच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामतीकरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ते ज्या पद्धतीने बारामतीचा सर्वांगीण विकास करीत आहेत, त्या विकासाला ते सत्तेत आल्यामुळे पुन्हा एकदा गती मिळेल, असा विश्वास बारामतीकरांनी व्यक्त केला.
बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव म्हणाले, ‘‘अजित पवार हे बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत, त्यामुळे ते सत्तेत सहभागी झाल्यामुळे बारामतीचे विकासाला अधिक गती मिळेल. आमच्या दृष्टीने ते म्हणतील ती पूर्व दिशा, असे समीकरण आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासमवेत कायमच आहोत.’’
विकासाच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय योग्य आहे, सर्व बुद्धिजीवी लोक देखील त्यांच्या समवेत आहेत, त्यामुळे आम्ही दादांसोबतच आहोत, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.