मुंबईः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आणि विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे.
अशोक चव्हाण यांनी स्वतःही याबाबत माहिती दिली. पुढचा निर्णय दोन दिवसांमध्ये जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांच्या भूमिकेनंतर काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे आम्हाला दुःख झालं आहे. पक्षाने त्यांना मोठमोठ्या पदावर संधी दिली होती. परंतु सध्या भाजपकडून ज्या पद्धतीचं राजकारण सुरु आहे, त्यावरुन त्यांच्यावर कोणता दबाव होता का, हे स्पष्ट होईल.
चव्हाण पुढे म्हणाले, अशोक चव्हाण पक्ष सोडून गेलेले असले तरी त्यांच्यासोबत इतर आमदार, पदाधिकारी जाणार नाहीत. भाजपकडून केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे उद्या आम्ही आमदारांची बैठक बोलावली असून सगळे मुंबईत येत आहेत. कुणी कुठेही गेलेलं नाही.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे बाध्य केलं गेलं, हे समजत नाहीये. असं असलं तरी काँग्रेस मजबुतीने भाजपचा सामना करणार आहे.
काँग्रेसबद्दल अशोक चव्हाण काय म्हणाले?
'काँग्रेसमधून राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय?' या प्रश्नाला अशोक चव्हाणांनी उत्तर दिलं की, प्रत्येक गोष्टीला कारण असलच पाहिजे, असं काही नाही. माझ्या जन्मापासून मी काँग्रेसचं काम केलं आहे. आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, असं वाटलं म्हणून राजीनामा दिला. कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची मी वाच्यता करणार नाही. मला उणी-दुणी काढायची नाहीत. आपण आता वेगळा विचार केला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. या निर्णयात माझी कोणतीही मजबुरी नाही... असं अशोक चव्हाणांनी राजीनाम्यानंतर स्पष्ट केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.