
Balasaheb Thorat: बाळासाहेब म्हणाले, 'एकट्या भाच्याला करमणार नाही'; सत्यजीत तांबे स्वगृही परतणार?
नाशिक पदविधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक आलेले सत्यजीत तांबे स्वगृही परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तांबे यांच्या भूमिकेवर स्पष्ट मत मांडलं. त्यांच्या एका विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
संगमनेरमध्ये झालेल्या जाहीरसभेत बाळासाहेब थोरात बोलत होते. नाशिक पदवीधर निवडणूकीदरम्यान झालेल्या राजकीय नाट्यावर थोरातांनी यावेळी भाष्य केलं.
काय म्हणाले थोरात?
राज्यात भारत जोडो यात्रा आलेली तेव्हा सत्यजीत तांबे यांनी खुप मेहनत घेतली. सत्यजीतची टीम काँग्रेसमध्ये राहिली आहे. पण तो एकटा राहिला आहे. आता तुलाही करमणार नाही, त्यांनाही करमणार नाही आणि काँग्रेसलाही करमणार नाही. असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सत्यजीत हे काँग्रेसमध्ये पुनरागमन करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
तसेच, माझा हात नीट असता तर तांत्रिक चूकही झाली नसती. मी स्वतः नाशिकमध्ये राहिलो असतो, ती चूक होऊ दिली नसती. परंतू या सगळ्यामधून माझ्या मताची दिल्लीने दखल घेतली आहे. काहीही झाले तरी पक्षांतर्गत गोष्टी आम्ही पक्षातच सोडवू. असं वक्तव्य थोरात यांनी यावेळी केलं.
देशात कुठेही नसेल एवढा जनसंपर्क या पाच जिल्ह्यात तांबे यांचा आहे. मी नेहमी त्यांना म्हणतो की, मला तमुची गाडी आणि ड्रायव्हरचे कौतुक वाटते. सुधीर तांबे यांनी पाचही जिल्ह्यात जिव्हाळ्याचे नाते तयार केले, हे नाते सत्यजीत तू विसरू नको, असा सल्ला थोरात यांनी यावेळी सत्यजीत यांनी दिला.
यासोबतच, तुझा अपक्ष आता किती दिवस टिकते ते पाहू. कारण आमच्याशिवाय काही जमणार नाही आणि तुलाही करमणार नाही. असं पुन्हा विधान थोरत यांनी केलं.