मोठी बातमी! झेडपी, महापालिकेवर आणखी वर्षभर प्रशासकच? लोकसभा, विधानसभेनंतरच ‘स्थानिक’च्या निवडणुका

प्रभागरचनेच्या प्रलंबित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काही दिवसांत अंतिम निकाल न झाल्यास पुढचा पावसाळा, त्यानंतर येणारी लोकसभा, विधानसभा निवडणूक, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर आणखी एक-दीड वर्ष ‘प्रशासकराज’च राहील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
Election on Maharashtra
Election on MaharashtraSAKAL

सोलापूर : राज्याच्या सत्तासंघर्षात महापालिकांवरील प्रभागरचनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोचला. त्यावर अजून निर्णय झाला नसून आता ३० मे रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यावेळी प्रभागरचनेच्या प्रलंबित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काही दिवसांत अंतिम निकाल न झाल्यास पुढचा पावसाळा आणि त्यानंतर येणारी लोकसभा, विधानसभेची निवडणूक, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर आणखी एक-दीड वर्ष ‘प्रशासकराज’च राहील, असे ग्रामविकास विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिकांवरील सत्ताधाऱ्यांची पाच वर्षे संपली आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रभागरचनेच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सध्या राज्यातील १४ महापालिका व २५ जिल्हा परिषदांसह दोन हजार ४४८ नगरपालिका, नगरपंचायतींसह पंचायत समित्यांवर प्रशासकच आहे.

तत्पूर्वी, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ओबीसी आरक्षणामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कायद्यात दुरुस्ती करून प्रशासकास दोनदा सहा-सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. आता निवडणूक होईपर्यंत त्याठिकाणी प्रशासकच राहतील, असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्यातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यासारखी परिस्थिती नाही.

दरम्यान, पावसाळ्यात निवडणूक अशक्यच मानली जाते. त्यामुळे दिवाळीत निवडणुकीचा पहिला टप्पा होईल, अशीही शक्यता आहे. पण, त्याचवेळी लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा, विधानसभेनंतरच होतील, असेही सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आणखी एक ते दीड वर्षापर्यंत प्रशासकच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पाहतील, अशी सद्य:स्थिती आहे.

दोन टप्प्यातच ‘स्थानिक’च्या निवडणुका

राज्यातील मुदत संपलेल्या सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांची निवडणूक एकाचवेळी घेण्याएवढी यंत्रणा, मनुष्यबळ निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका अशा शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घ्यावी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्या निवडणुकांसाठी किमान तीन ते पाच महिने लागणार आहेत.

एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत लोकसभा, विधानसभा निवडणूक

देशातील लोकसभेची निवडणूक ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत पार पडली. सतराव्या लोकसभा निवडणुकीतून ५४३ खासदारांची निवड केली गेली. दुसरीकडे २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले होते. आता लोकसभा निवडणुकीसाठी बहुतेक जिल्ह्यांमधील शासकीय गोदामांमध्ये व्हीव्हीपॅट मशिन, ईव्हिएम व चार्जिंग मशिन पोचल्या आहेत. ऑक्टोबर २०२३ नंतर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु होईल. त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com