बोरू वटवट्या,बोरडी मैनासह इचलकरंजीत 102 प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद

Birds News
Birds NewsSakal

इचलकरंजी (कोल्हापूर) : पक्षीसंवर्धन क्षेत्रातील दोन दिग्गज व्यक्तिमत्वे म्हणजे पाच नोव्हेंबर रोजी जन्मलेले डॉ. मारुती चितमपल्ली (Dr. Maruti Chitampally) आणि १२ नोव्हेंबर रोजी जन्मलेले पद्मविभूषण डॉ. सालेम अली. (Dr. Salem Ali) महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाकडून ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी-सप्ताह (Bird Week Special Day) साजरा करण्याचा निर्णय गतवर्षी घेण्यात आला. त्यानिमित्ताने इचलकरंजी परिसरातील पर्यावरण रक्षण आणि पक्षीजीवन यावर प्रकाश टाकणारे विशेष वृत्त.

पक्षी पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते परागीकरण करतात, स्वच्छता करतात आणि इतरांसाठी भक्ष्यही असतात. लोकांना पक्षी निरीक्षण आवडते, त्यामुळे ते स्थानिक अर्थव्यवस्थेचा भाग होऊ शकतात. पक्षी निरीक्षकांच्या वाढत्या संख्येमुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळालीच तसेच पक्षांचे निरीक्षण आणि गणनेमुळे नागरिकांना याबाबत कुतूहल वाढत आहे.

Birds News
अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या ब्यूटीचे सिक्रेट ; 'या' टिप्स करते फाॅलो

पक्षी संवर्धनासाठी अनेकजण पुढाकर घेत आहे.हीच आता काळाची गरज बनली आहे.इचलकरंजी शहरात अनेकवेळा केलेल्या पक्षी निरीक्षणातून तब्बल 102 प्रजातीच्या पक्षांची नोंद झाली आहे.गणनेची संख्याही मोठी आहे. मानवी वस्ती, नदीकाठ,उद्याने,शेती,पाणतळ आदी ठिकाणी या पक्षांचे अधिवास आहेत. पक्षी संवर्धनासाठी शहरात काही संघटना काम करतात .मात्र आता पर्यावरणाचे रक्षण करून पक्षी संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे.मानवी आरोग्याचा पक्ष्यांशी जवळचा संबंध आहे. त्यांची घटती संख्या हा मानवी जीवनाला धोक्याचा इशारा आहे.

वनस्पतींच्या वाढीसाठी पक्षी

सृष्टीतील विविध घटक म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून आपले अन्न मिळवण्याच्या कृतीद्वारे जवळपास सर्वच प्रकारचे पक्षी निसर्ग संवर्धनाचे काम करत असतात. अनेकविध वनस्पतींच्या फुलांचा मधुरस चाखण्यासाठी फुलांवर येणारे फुलटोचे किंवा सूर्यपक्षी हे फुलांच्या परागीकरणाचे काम करत असतात. परागीकरणामुळेच वनस्पतींमध्ये फलधारणा व त्या योगे बीज-निर्मिती होत असते. अशा बीजनिर्मितीद्वारेच वनस्पतींचा पुढे प्रसार होत असतो. त्या वनस्पती पुन्हा नव्याने जन्माला येतात. पक्षी हे वनस्पतींची वाढ कमी करणाऱ्या किडे, कीटक, कृमींचा चट्टामट्टा करून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतात आणि वनस्पतींची वाढ अबाधित ठेवण्यासाठी मोठाच हातभार लावतात.

समस्यांच्या निराकरणासाठी पक्षी

मेलेल्या प्राण्यांच्या शरीराचे अवशेष जर कावळे, घारीं आणि गिधाडांसारख्या पक्ष्यांनी खाऊन नष्ट केले नाहीत तर असे प्राणिज अवशेष कुजल्यामुळे त्यातून मुक्त होणारा मिथेनसारखा वायू जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरतो. हे पक्षी त्या समस्येपासून आपली मुक्तता करतात आणि त्याद्वारे जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या कार्याला हातभार लावतात.म्हणूनच जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल ह्या समस्यांच्या निराकरणासाठी पक्ष्यांचे अस्तित्व आणि त्यासाठी त्यांचे अधिवास टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याची गरज आहे.

Summary

मोठमोठी वाढलेली झाडे, पाण्याचा भाग, हिरवागार परिसर यामुळे नदीकाठाकडे अनेक पक्षी ओढले जातात.

अधिवास होताहेत वेगाने नष्ट

माळरान, पाणतळ ही पक्षांची प्रमुख अधिवास आहेत.मात्र अलीकडच्या काळात हे दोन्ही अधिवास वेगाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रस्ते, बांधकाम यासह औद्योगीकरणाच्या नावाखाली हे मूळ अधिवास आता पक्षांपासून दूर चालले आहेत. त्यामुळे अधिवासातील अनेक पक्षांच्या परिसंस्थांवर परिणाम होत आहे.हे अधिवास टिकून राहिले तरच अनेक पक्ष्यांचे जीवन प्रवाहित राहणार आहे.

नदीकाठावर संवर्धन गरजेचे

स्थानिक पक्षांसह परदेशी पक्षांसाठी नदीकाठ हे अत्यंत अनुकूल असते.मोठमोठी वाढलेली झाडे, पाण्याचा भाग, हिरवागार परिसर यामुळे नदीकाठाकडे अनेक पक्षी ओढले जातात.या ठिकाणी नानाविध प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास कायमस्वरूपी असतो. सध्या नदी घाट परिसरातील जैवविविधता जपून पक्षांच्या अधिवासाचे संवर्धन करण्याची जबाबदारी बनली आहे.

थंडीत परदेशी पक्षांचे आकर्षण

दरवर्षी थंडी पडली की शहरात काही परदेशी पक्षी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. युरोपातून स्थलांतरित होणारा बोरू वटवट्या आणि हिमालयातून येणारी बोरडी मैना पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय असतो.बोरू वटवट्या हा पक्षी चिमणीहुन लहान असतो.हिमालयातून गुलाबी रंगाची बोरडी मैना न चुकता थंडीच्या दिवसात येत आणि 3 महिने राहते.यासह अनेक परदेशी पक्षी नजरेस पडतात.

पक्षी निरीक्षण कशासाठी ?

*मनोरंजन व छंद म्हणून

* पक्षी अभ्यास व संशोधनासाठी

* पर्यावरण व पक्षी संवर्धनासाठी

* व्यसन व वाईट विचारांपासून दूर जाण्यासाठी..

* ताण तणाव कमी करण्यासाठी.

* व्यक्तीमत्व विकासासाठी

* चांगले निसर्गमित्र व पक्षीमित्र होण्यासाठी.

सध्या सिमेंटची जंगले झपाट्याने वाढत आहेत.अशा परिस्थितीत पक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पक्षांचा अधिवास जपण्याची गरज आहे. सिमेंटची घरे उभारताना त्याठिकाणी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तरी नागरिकांनी बांधावीत. जेणेकरून पक्षी संवर्धनासाठी मोठी मदत होईल.

बाळकृष्ण वरुटे, पक्षी छायाचित्र व अभ्यासक, इचलकरंजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com