मुख्यमंत्री म्हणाले ! 72 वर्षांतील सर्वात मोठा परतीचा पाऊस; मदतीचा निर्णय दोन- तीन दिवसांत

CM-Thackeray-Farmers-Heavy-Rain-696x364.jpg
CM-Thackeray-Farmers-Heavy-Rain-696x364.jpg

सोलापूर : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाच्या डोळ्यात पाणी आहे. 72 वर्षातील सर्वात मोठा परतीचा पाऊस झाला असून वेध शाळेच्या अंदाजानुसार धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सर्वांनी सावध राहावे, घराबाहेर पडू नये आणि जिवितहानी होणार नाही, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. सरकारकडून दोन- तीन दिवसांत मदतीची घोषणा केली जाईल. संकट अजून टळले नसून सर्वांनी सावध राहावे. खचून न जाता खंबीर राहा, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा शाब्दिक आधारही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला.


परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज (सोमवारी) अक्‍कलकोट दौऱ्यावर आले होते. दौरा आटोपल्यानंतर त्यांनी सोलापुरातील नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी, अतिवृष्टीत जिवितहानी झालेल्या दहा कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर आदी उपस्थित होते. 


बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा मदतीसाठी एकत्रित यावे 
राज्यात अतिवृष्टीची आपत्ती आल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी बिहारमध्ये जाऊन प्रचार करण्यापेक्षा मदतीसाठी एकत्रित येण्याची गरज आहे. केंद्राकडून मदत मागणे गैर नसून मदतीसाठी राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. विरोधक बाहेर पडल्यानंतर सत्ताधारी बाहेर पडल्याची टीका करणाऱ्यांनी दिल्लीत जावे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील बाहेर पडतील, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. 


शुक्रवारी पंतप्रधानांनी केला होता फोन 
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहेत. लवकरच एकूण नुकसानीची माहिती घेऊन बळीराजाला मदत केली जाईल. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: शुक्रवारी (ता. 16) मला फोन केला होता. अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे गरज पडल्यास केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com