सोलापूर : राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहून संबंधित राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेऊ शकेल, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्ट केले. त्यानुसार राज्यातील संसर्ग वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली. मात्र, निर्णय विद्यार्थीहिताचा नसल्याचे सांगत राज्यपालांनी कुलपती या नात्याने कायद्यातील बाबी पडताळून आपण निर्णय घेऊ, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. मात्र, परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय झाला नसून विद्यार्थ्यांचा रोष वाढू लागला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र पाठवून निर्णयाची विचारपूस केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मेअखेर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा होणे अपेक्षित होते. तर जुलैअखेर त्यांची लेखी परीक्षा घेऊन ऑगस्टमध्ये निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रात्यक्षिक परीक्षा झालीच नाही. तर 22 मेपासून लॉकडाउन शिथिल केल्यापासून राज्यातील रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये भितीदायक वातावरण असून मुख्यमंत्र्यांचा परीक्षा रद्दचा निर्णय राज्यपालांनी कायम ठेवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी राज्यपाल मुख्यमंत्री उच्च शिक्षण मंत्र्यांसह स्थानिक खासदार व आमदारांना ही निवेदने दिले आहेत. विद्यार्थ्यांची आक्रमकता पाहून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र पाठवले आहे. परंतु, त्यावर राज्यपालांनी काहीच उत्तर दिले नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
...तर राज्यपालांविरुद्ध रस्त्यांवर येऊ
राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रास्तच असून त्याचे राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मात्र, भाजप आणि त्यांची विद्यार्थी संघटना राज्यपालांच्या आडून राजकारण करीत आहे. मात्र, ही वेळ राजकारण करण्याची नव्हे तर विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करुन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसह शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय कायम ठेवून परीक्षा होणार की नाहीत, हे तत्काळ जाहीर करावे. अन्यथा रस्त्यांवर उतरून आंदोलन केले जाईल.
- परमेश्वर इंगोले, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस
दहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटरची चिंता
राज्यातील 13 कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या सुमारे साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये आठ ते दहा हजार दिव्यांग विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना एरव्ही सहजासहजी रायटर उपलब्ध होत नाहीत. आता कोरोनाच्या भीतीने अनेक विद्यार्थी गावी गेले आहेत. त्यामुळे या दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर मिळणे कठीण होणार आहे. कोरोनाचा संसर्ग संपर्कातून वाढत असल्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर न मिळाल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते.
परीक्षा रद्द होणारच 'ही' आहेत कारणे...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.