
आज आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय, कारण... : मुख्यमंत्री
मुंबई : मराठी भाषेवरून शिवसेनेवर अनेकदा टीका केली जाते. त्यालाच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) उत्तर दिले आहे. आमच्यावर यापूर्वी टीका झाली आणि आताही होतेय. पण, टीकेला आम्ही किंमत देत नाही. कारण, टीका करणारे लोक काय किंमतीचे आहेत? हे आम्हाला माहिती आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आज आयुष्याचं सार्थक झालं असल्याचं ते म्हणाले. ते मराठी भाषा भवनाच्या (Marathi Bhasha Bhawan) उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
हेही वाचा: एअर इंडिया मेगा नोकर भरतीत मराठी तरुणांना प्राधान्य द्या - गजानन कीर्तिकर
आमच्यावर आजही टीका होते. टीकेला आम्ही किंमत देत नाही. टीका करणारे लोक काय किंमतीचे आहेत? माहिती आहे. मराठी मराठी करता आणि यांची नातवंड इंग्रजी शाळेत जातात, अशी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर झाली होती. पण, त्यांनी आधीच सांगितलं होतं, की शाळेत इंग्रजी आणि घरात मराठी आहे. आमच्याकडे मराठीत बोललं जातं. माझे दोन्ही मुलं तिन्ही भाषा बोलतात. पण घरात मराठी बोलतात. मराठी भाषेचा न्यूनगंड असता कामा नये. आपआपल्याला मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा आहे. मराठी भाषेनं आपल्याला जपलं आहे. आता आपण तिला जपायचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आयुष्यासाठी सार्थक झाल्यासारखं वाटतंय -
माझे आजोबा मुंबईसाठी लढले. माझ्या वडिलांनी मराठी भाषिकांना न्याय मिळवून दिला. आज मला माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. शिवसेनेनं मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचा काम केलं. माझ्या आजोबांचा नातू आणि शिवसेनाप्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आज इथं लागलंय यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणती असेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर भाषांचं आक्रमण नको -
भाषा ही संस्कृतीची ओळख आहे. कर्नाटकात मराठी भाषिकांवर जो अत्याचार होतो तो आपण सहन करता कामा नये. मराठी कोणावर अत्याचार करत नाही. आपल्या राज्यात इतर भाषांचं आक्रमण नको. पण, इतर राज्यांमध्ये मराठी भाषिकांवर अत्याचार केला जातो. त्यांच्यासाठी आपण लढलो पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी परत एकदा बेळगावचा मुद्दा उचलून धरला. इंग्रजांच्या डोक्यात मराठी गेली आणि लोकमान्य टिळकांना कारावास झाला. कारण, त्यांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा अग्रलेख मराठीत लिहिला होता. आता कामकाजाची भाषा मराठी असणार आहे. आपल्या राज्य कारभाराची भाषा ही मराठीच असायला पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.
Web Title: Cm Uddhav Thackeray On Marathi Importance In Marathi Bhasha Bhawan Program Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..