स्वत:चे उमेदवार नाहीत आणि जगातील मोठा पक्ष; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १२ मुद्दे

स्वत:चे उमेदवार नाहीत आणि जगातील मोठा पक्ष; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १२ मुद्दे
Summary

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत अनेक नेत्यांवर टीका केली. तसंच ईडी, सीबीआय, अंमली पदार्थ, राज्यपालांचे पत्र, लखीमपूरची घटना यावरही भाष्य केलं. (Shivsena dussehra rally Uddhav Thackeray speech)

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा समाचार घेतला. केंद्रीय तपास यंत्रणांचा केला जाणारा वापर आणि शिवसेनेला बदनाम करण्याचे प्रयत्न यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. सुरुवातीलाच उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या भाषणानंतर अनेकजण टीका करतील. बोलायला ते बसलेच आहेत. मी म्हणेन तुम्ही चिरकताय, कितीही चिरका पण माझा वाडा चिरेबंदी आहे.

"...तर मी राजकीय जीवनातून बाजुला झालो असतो"

विजयादशमी म्हटलं की हिंदुत्त्व आलंच, आपले विचार एक आहेत पण धारा वेगळ्या असू शकतील. केवळ हिंदुत्व म्हणून भाजपशी युती केली होती. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्रिपदी असता पण वचन मोडले.

शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवीन हे वचन दिलं होतं आणि ते पूर्ण करून दाखवीनच. जर भाजपाने वचन पाळलं असतं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असतं तर मी राजकीय जीवनातून बाजुला झालो असतो. हे माझं क्षेत्र नाही आणि पुत्राचं कर्तव्य म्हणून मी या क्षेत्रात आलोय. जबाबदारी पार पाडण्यासाठी उभा राहिलो आहे, आणि जबाबदारी पार पाडल्याशिवाय राहणार नाही.

मोदींवर टीका

मी काही फकीर नाही, झोळी वगैरेचं थोतांड नाही. हे झोळी वगैरे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत. पण जे दोन मेळावे म्हटलं त्यात आरएसएसचा मेळावा आहे. दोन्हीमध्ये हिंदुत्व ही विचारधारा समान आहे. मला मोहन भागवतांना सांगायचं आहे मला माफ करा, मी जे बोलतोय ते तुम्हाला नाही. जर आपलीच माणसे ऐकणार नसतील तर ही विचारांची थेरं कशाला.

राष्ट्राभिमानी हिंदू

आमचं हिंदुत्त्व म्हणजे काय तर राष्ट्रीयत्व आहे, आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय की माणूस म्हणून पहिल्यांदा जन्म होतो. नंतर जात पात येते. आपला धर्म घरात ठेवून बाहेर पडायचं. घराबाहेर माझा देश हाच माझा धर्म हे आमचं हिंदुत्व आहे. आमच्या मार्गात जर कोणी स्वत:च्या धर्माची मस्ती घेऊन आडवा आला तर राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

लखीमपूरच्या शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरून आले का?

हिंदुत्व म्हणजे काय हे सांगताना ते म्हणाले होते की, सर्वांचे पूर्वज एक होते. हे जर तुम्हाला मान्य होते तर मग विरोधी पक्षांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का, लखीमपूरला जे शेतकरी मारले गेले त्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला.

दिवसाढवळ्या हे जे दिसत आहे ते मोहनजी तुम्हाला मान्य आहे का, सर्वसामान्य माणसांना हेच सांगायच आहे की तुम्ही सर्वात ताकदवान आहात. तुमचं मत हे रावाचा रंक करू शकतो. तुम्ही कशाला दुबळं समजता.

सत्तेचं व्यसन हासुद्धा एक अमली पदार्थच

हिंदुराष्ट्र हा सत्तापिपासू हा नसतो तर सर्व समावेशक म्हणून हा शब्द असतो. सत्तेसाठी संघर्ष करताना वैचारिक लढा असावा युद्ध नको. मग तुमच्या विचारधारेतून जे लोक सत्तेत बसलेत त्यांना ही शिकवणी लावा असंही मुख्यमंत्री म्हणाले. वाट्टेल ते करावं पण मला सत्ता पाहिजे, सत्तेचं व्यसन हासुद्धा एक अमली प्रकारच आहे. या अमली प्रकाराचा बंदोबस्त कोणी करायचा, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

छापा टाकायचा आणि काटा काढायचा

तुमच्या हक्काच्या सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होतील. पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आजही सांगतो हिंम्मत असेल तर पाडून दाखवा. काही केलं तरी पडत नाही. मग आपल्याकडे खेळ आहे ना, छापा की काटा? छापा टाकायचा आणि काटा काढायचा. पण हे जास्त काळ चालणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले.

ममता बॅनर्जींचे अभिनंदन

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरुय. स्वातंत्र्य काळात लाल बाल आणि पाल पुढे होते. महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल पुढे होता. आता बंगालने कर्तृत्व दाखवलं आहे. ममता दिदींचे आणि बंगाली जनतेचे अभिनंदन की तुम्ही कोणासमोरही न झुकण्याची जिद्द कायम ठेवलीत. आणि ती जिद्द आपल्यात आहे ती तयार ठेवावी लागेल. हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण वेळ आलीच तर दाखवावंच लागेल.

हिंदुत्वाला नव हिंदूंपासून धोका

तोंडामध्ये बोळा घालून बसलेली ही शिवसेनेला बदनाम करणारी लोकं. जर ९२ - ९३ ला शिवसेनेची लोकं उतरली नसती तर तुमचे लोक उरले असते का? देशात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली गेली की, हिंदुत्वाला धोका आहे का? केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं की, हिंदुत्त्वाला धोका नाही. याच क्षणाची वाट बघत होतो पण हिंदुत्त्वाला परक्यांपासून धोका नाही तर या नवहिंदूंपासून खरा धोका आहे.

सावरकरांच्या मुद्यावर

राजनाथ सिंगांनी केलेलं विधान वादग्रस्त झालं, सावरकर, गांधीजी शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का आपली, गांधीजी, सावरकर हे आपल्याला समजलेत का? झुंडबळी घेणारं आपलं हिंदुत्व नाही असं राजनाथ म्हणाले होते. हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर जेव्हा धोका होता तेव्हा एकच हिंदुहृदयसम्राट उभे राहिले होते. हिंदुत्वाच्या शत्रूंच्या धमक्यांना न घाबरता ते उभे राहिले. धमक्या येतायत पण ज्या रंगाची गोळी स्पर्शून जाईल तो रंग हिंदुस्थानातून पुसुन टाकू असं त्यांनी सांगितलं होतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

९२ - ९३ मध्ये दंगली झाल्या तेव्हा कोणी घेतली होती जबाबदारी? बाबरी पाडली तेव्हा शेपूट घालून बिळात लपले. थरथरत होते. बोलायची कोणामध्ये हिम्मत नव्हती पण तेव्हा शिवसेनाप्रमुख बोलले होते गर्व से कहो हम हिंदू है. तेव्हा मुंबई वाचवली ती पोलिस आणि लष्कराच्या बळाने नाही. तेव्हा पोलिस आणि लष्कर शिवसेनेला पिटाळत होते, असा दावाही त्यांनी केला.

भाजपमध्ये जाणारे पवित्र कसे होतात?

हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले तर पवित्र झाले. गटारीचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा, दुसरीकडे टाकलं तर गटार गंगा. ही जी थेरं चाललीत ती हिंदुत्त्व नाही, खोटे आरोप करणं हे नामर्दपणाचं लक्षण. शिवरायांचं नाव घ्यायचं तर मर्दासारखं घ्यायचं. कोणाच्या तरी आडून लपून हल्ले करायचे, आणि मग तो मी नव्हेच, षंढ आहेस तू. वडिलोपार्जित शब्दांची संपत्ती आहे ती वापरू द्या, संपत्ती सगळीच आहे माझ्याकडे. थोडेफार आजोबांचे शब्द पाठ आहेत. वडिलांचेही आहेत. थोडे माचे संस्कार आहेत म्हणून वाचतायत. नाहीतर फाडायला वेळ नाही लागत. पण तुमच्या लेखी शिवसैनिक भ्रष्ट झाला का? तुम्ही त्याच्या मागे लागताय आता.

स्वत:चे उमेदवार नाहीत आणि जगातील मोठा पक्ष

सत्ता पिपासू पणा किती, सगळ्या गोष्टी पाहिजेत, किती , घे ना बाबा, पंढरपूरसह एका ठिकाणी यांच्याकडे उमेदवार नव्हते. दोन पोट निवडणुकीत स्वत;चे उमेदवार नाहीत. उपरे घ्यावे लागतात आणि म्हणे जगातला मोठा पक्ष असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

एक फिल्म का दाखवली, साधरणत मेळाव्यात वक्त्यांची रांग असते. पण आपण केलेली कामं हाच आपला वक्ता. अभिमानाने सांगता आलं पाहिजे की हे आम्ही केलं.

राज्यपालांसोबतचे लेटर वॉर

राज्यपालांनी पत्र लिहिले. आम्हाला माता भगिनींचा सन्मान आमच्यात आहे. बलात्कार करणाऱ्याला फासावर लटकवल्या शिवाय स्वस्थ नाही. राज्यपालांना दिलेल्या उत्तराचे समर्थन. कायदा कडक शासन सगळं करतोहोत. देशात घडू नये यासाठी काय करणार मोदींना अधिवेशन घ्यायला सांगितले. महाराष्ट्रात काही घडले की गळे काढायचे. उत्तर प्रदेशात काय सुरु आहे. २६ नोव्हेंबर ज्यांनी बलिदान केले त्या खात्याला माफीया म्हणणे चूक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com