राज्यात लोडशेडींग असणार का? ऊर्जामंत्र्यांनी दिलं उत्तर

ऊर्जामंत्री : ‘महाजनको’ करणार आठ हजार मेगावॉट वीजनिर्मिती
Nitin Raut
Nitin RautSakal

मुंबई : राज्यात कोळशाची टंचाई आहे पण कुठेही भारनियमन नाही. कोळसा टंचाईमुळे विजेची तूट झाली असून याला पर्याय म्हणून ‘महाजनको’ आठ हजार मेगावॉट वीज निर्माण करून राज्याला देईल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज दिली.

अपुरी वीजनिर्मिती आणि कोळसा टंचाईने भारनियमनाचे संकट ओढविण्याची भीती असतानाच पुरेशा वीजनिर्मितीसाठी कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पुढाकार घेतला आहे. विजेची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी सुमारे आठ हजार मेगावॉट वीजनिर्मिती ‘महाजनको’ करणार असून, यंत्रणाही उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्याच्या स्थितीत एक लाख टन कोळशाची खरेदी करण्यात येणार आहे. या उपायांमुळे भारनियमन राहणार नसल्याचा दावा राज्य सरकारने केला.

राज्यातील विजेची मागणी पुरवठा, संभाव्य गरज आणि वीजनिर्मितील अडचणींवर उपाय करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक घेतली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे यांच्यासह या खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. वीज संकट रोखण्यासाठी दर आठवड्याला आढावा घेऊन, तातडीचे उपाय करण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्या. या बैठकीनंतर राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

राऊत म्हणाले, ‘‘यापुढच्या काळात मागणीनुसार तोही दर्जेदार कोळसा उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या १ लाख ३८ हजार टन कोळशाची गरज असून, त्यापैकी १ लाख १७ हजार टन उपलब्ध होत आहे. मागणीच्या प्रमाणात कमी कोळसा असल्याने वीजनिर्मितीत तूट आहे. कोळसा खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाजनको आता फायद्यात आहे.’’

पाच दिवसांत भारनियमन नाही

‘‘देशभरातील १२ राज्यांत वीज टंचाई आहे. त्यातील काही राज्यांत भारनियमन आहे. परंतु, महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत तसे केलेले नाही. सुमारे ४ लाख टन कोळसा खरेदीसाठी मंजुरी मिळाली आहे. मागणी आणि कोळसा कमी असल्याने काही दिवसांपूर्वी रोज दोन ते अडीच हजार मेगावॉट विजेची तूट होती. ती कमी केली आहे,’’ असेही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांशी बोलणार

उरण येथील गॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्र्यांशी स्वत: बोलून मार्ग काढणार आहे. नवे उपाय आणि प्रत्यक्ष वीजपुरवठा यासाठी आपण कोणत्याही पातळीवर कमी पडणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com