
नाना पटोले दिल्लीला रवाना... अधिवेशनानंतर घडामोडींना वेग
हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरही विधानसभेच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी आहे. यंदा विधानसभेला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता होती. मात्र आता राज्यपालांनी दाबलेल्या नाकामुळे महाविकास आघाडी सरकारला श्वास घेणं कठीण झालंय. या प्रकरणात घटनात्मक पेच वाढला आहे. त्याचे राजकीय पडसाद उमटालया सुरुवात झालीय. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना झाले आहेत. (nana patole)
विधानसभा अध्यपदाच्या निवडणुकीवरून राज्यात वाद सुरू आहेत. त्यातच काँग्रेसकडून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय. अध्यक्षपदाचा पेच घटनात्मक असल्याने त्यासाठी नाना पटोले दिल्लीत हायकमांडची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. राज्यपालांनी सरकारची निवडणूक प्रक्रिया घटनाबाह्य ठरवल्याने आगीत तेल ओतल्याचं चित्र आहे.
नाना पटोले यांना काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्याच्या राजकीय चर्चा होत्या. आता पटोले यांना मंत्रीपद मिळणार का, हे लवकरच स्पष्ट होऊ शकतं.
अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांत विधानसभा अध्यक्ष (Speaker of the Legislative Assembly) निवडण्याची तयारी काँग्रेसने (Congress) केली होती. या पदासाठी उमेदवार रविवारी (ता. २६) दिल्लीतून जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र अधिवेशन संपल्यानंतरही ही निवडणूक झाली नाही.
काय म्हणाले पटोले?
अध्यक्षपदासाठी प्रदेश समितीने कोणाच्याही नावाची शिफारस केलेली नसून, त्यासंदर्भातील निर्णय ‘हायकमांड’च घेणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले. त्यामुळे दिल्लीतील नेते अध्यक्षपदाचा कोणाला देणार, याची उत्सुकता आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता होती. मात्र, काँग्रेसमधील उमेदवारीच्या गोंधळामुळे अधिवेशनसंपेपर्यंत निवडणूक झाली नाही.
Web Title: Congress Leader Nana Patole Left For Delhi For Vidhansabha Speaker Election 2021
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..