महाविकास आघाडी अनैसर्गिक पटोलेंचा टोला; अंबादास दानवे यांच्या नियुक्तीला आक्षेप

आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही, आम्ही सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आले होते, हे लक्षात ठेवावे,’’ असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडीतील घटक पक्षांना लगावला.
congress Nana Patole Mahavikas Aghadi ambadas danve politics aurangabad
congress Nana Patole Mahavikas Aghadi ambadas danve politics aurangabadSakal

औरंगाबाद : ‘‘ महाविकास आघाडी पर्मनंट नाही किंवा नैसर्गिकही नाही. विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र लढावे की नाही, याबाबतचा निर्णय कार्यकर्तेच घेतील. आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही, आम्ही सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आले होते, हे लक्षात ठेवावे,’’ असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडीतील घटक पक्षांना लगावला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॉंग्रेसतर्फे शहरात ‘आझादीचा गौरव’ पदयात्रेचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने शहरात आलेले नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेचे अंबादास दानवे यांना दिल्याबद्दल काँग्रेसने नाराज व्यक्त केली आहे. त्यावर आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय होण्याची गरज होती. पण तसे झाले नाही त्यामुळे मुंबईत गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.

शिंदे सरकार टिकणार नाही

‘‘मलईदार खाते मिळविण्यासाठी मंत्र्यांमध्ये सध्या वादावादी सुरू असून त्यामुळेच सरकारचे खाते वाटप रखडले आहे. अंतर्गत वाद पाहता हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही,’’ असा दावाही पटोले यांनी केला. ते म्हणाले, की ‘‘ राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ३९ दिवस मंत्रिमंडळ स्थापन केलेले नव्हते. आता मंत्रिमंडळ झाले पण प्रत्येकालाच मलईदार खाते हवे आहे, त्यासाठी दोन दिवसांपासून वाद सुरू आहेत त्यामुळेच खाते वाटप होऊ शकलेले नाही. मंत्र्यांमध्ये जे वाद सुरू आहेत ते पाहता सरकार जास्त दिवस टिकणार नाही.’’

पटोलेंनी अर्ध्यावर सोडली पदयात्रा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरात काढण्यात आलेली ‘आझादीचा गौरव’ पदयात्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (ता. ११) अर्ध्यावर सोडली. कार्यकर्ते पुढे अन् पटोले मागे असे चित्र फेरीत काही काळ होते. त्यामुळे सिटी चौकातून पटोले यांनी फेरीतून काढता पाय घेतला. त्यानंतर शहराध्यक्ष युसूफ शेख यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकापर्यंत फेरी काढण्यात आली. पदयात्रेची वेळ सकाळी ९.३० ची होती. त्यानुसार सकाळी ९ वाजेपासून कार्यकर्ते, पदाधिकारी गांधी पुतळ्याजवळ जमा होत होते. सुरवातीला तासाभरात पटोले यांचे आगमन होईल, असे सांगण्यात आले पण तब्बल चार तास उशिराने पटोले आले. त्यामुळे पदयात्रेसाठी आलेल्या महिला, विद्यार्थी, युवती उभ्या राहून कंटाळल्या. अनेकांनी गांधी पुतळ्याखाली ठिय्या मांडला. काही महिलांनी आम्हाला दोन तासांचा वेळ सांगण्यात आला होता पण चार तास उलटले तरी पदयात्रा सुरू झाली नाही, अशा भावना व्यक्त केल्या.

स्थानिक निवडणुका एकत्र लढविणार : अजित पवार

राज्यातील होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हास्तरावर होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी रात्री मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत आगामी निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी यावरही चर्चा झाली.

शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्यायला हवी पण हे सरकार शेतकऱ्यांना लॉलीपॉप देतेय. गुजराती नेत्यांसाठी हे सरकार आहे. देशात लोकशाही संपविण्याचे जे काम सुरू आहे, त्याविरोधात आमची ही यात्रा आहे.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा निर्णय हा पक्षाचा निर्णय असतो. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना लागू असेल. शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अंबादास दानवेंची नियुक्ती केली यावर आमची चर्चा झाली आहे. महाविकासआघाडीचे निर्णय समन्वयातून व्हावेत अशाप्रकारची अपेक्षा काँग्रेसची आहे. नाराज होण्याचा मुद्दा नाही, मात्र महाविकासआघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. एकोपा राहिला पाहिजे हीच आमची भावना आणि भूमिका आहे पण महत्त्वाचे निर्णय होताना काँग्रेसला विश्वास घ्यावे अशी आमची किमान अपेक्षा आहे.

- अशोक चव्हाण, काँग्रेस नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com