भारताचे संविधान आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिन’ साजरा करण्यात येतो. विद्यार्थी, शिक्षकांकडून या दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येते.
भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणार आहेत. हीच तत्त्वे शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना देशाचे जागरूक नागरिक बनविणे आवश्यक आहे. संविधानातील तत्त्वांचा प्रसार व प्रचार करण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व त्यातील तत्त्वांविषयी जागृत करण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा दिवस शाळांमध्ये साजरा करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येते.
भारतीय संविधान भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. संविधान, संविधानातील प्रस्तावना अमूल्य ठेवा आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य कोणते? या देशातील शासन व्यवस्था, संविधानिक मूल्य, घटनेची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये कोणती याची इत्यंभूत माहिती या देशातील प्रत्येकाला व्हावी, विशेष करून शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थी भावी नागरिक आहेत. या विद्यार्थ्यांना संपूर्ण संविधानाची व संविधानिक मूल्यांची ओळख व्हावी, हा व्यापक व विधायक उद्देश समोर ठेवून प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन शाळा व महाविद्यालयात केल्याने शालेय जीवनापासून मुला-मुलींना संविधानाची माहिती होईल.
संविधान वाचनामुळे शाळा, महाविद्यालयीन जीवनापासून मुला-मुलींची मने सुसंस्कारित होतील. दररोजच्या वाचनामुळे प्रास्ताविकाचे पाठांतर होईल. प्रास्ताविकामधील शब्दांचा अर्थ हळूहळू समजायला लागेल. मुला-मुलींच्या माध्यमातून संविधानाबाबत माहिती होईल. देशाचा, राज्याच्या संपूर्ण कारभार संविधानाअंतर्गत चालतो. संविधानाला सन्मान म्हणजे राष्ट्रभक्ती आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अधिनियमित होऊन स्वत: प्रत अर्पित झाले. २६ नोव्हेंबर १९५० रोजी देश प्रजासत्ताक झाला.
संविधानाचा खऱ्या अर्थी अंमल सुरू झाला. राष्ट्राची एकात्मता व बंधुतेसाठी संविधानाबाबत माहिती असणे आवश्यक आहे. संविधान राष्ट्रनिर्मितीचा, देशाच्या संपन्नतेचा व समृद्धीचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. हक्क व संरक्षणासोबतच नागरिकांचे कर्तव्य व जबाबदारी महत्त्वाची आहे. नागरिकांना संविधानाची ओळख होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर संविधानदिनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन झाल्यानंतर प्रत्येक शाळेतून संविधान यात्रा काढण्यात येते.
संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा, चित्रकला, स्लोगन, पोस्टर्स, समूहगान आदी स्पर्धांचे आयोजन शाळा व महाविद्यालयात करण्यात येते. विद्यार्थ्यांसोबत पोलिस, सर्वसामान्य नागरिकांनाही संविधानाची आणि त्यातील मौलिक तत्त्वाची माहिती होणे आवश्यक असल्याने राज्य सरकारकडून शाळांसोबत सरकारी कार्यालयातही हे कार्यक्रम साजरे केले जातात. केंद्र व राज्य सरकारकडून तसा आदेश काढला जातो.
- प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.